जळगाव : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्यात आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला असून, यात महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. दरम्यान, पहलगाम येथे गेलेले जळगाव जिल्ह्यातील पर्यटक सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे. Pahalgam Terror Attack
दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला करण्यापूर्वी त्यांना धर्म विचारले तसेच काही पर्यटकांना पँटही काढायला सांगितली. त्यानंतर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या, अशी भयावह माहिती समोर आली असून, राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सखोल तपास सुरु आहे.
जळगाव जिल्ह्यातील पर्यटक सुखरूप
मैत्रिणींसोबत जम्मू कश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या जळगावच्या नेहा वाघुळदे व त्यांच्या मैत्रिणी सुखरूप असल्याची माहिती
नेहा वाघुळदे यांचे पती तुषार वाघुळदे यांनी दिली. जम्मू कश्मीरमध्ये हल्ल्या झाल्याची बातमी धडकताच नेहा वाघुळदे यांचे पती तुषार वाघुळुदे अस्वस्थ झाले होते. पत्नी नेहाला फोनवर संपर्क साधला असता ते सुरक्षित असल्याची माहिती दिली. सैन्य दलाने घटनेनंतर सुरक्षित स्थळी हलवून अनेकांचे प्राण वाचवले. सुरक्षित स्थळी हलवल्यानंतर आज नेहा वाघुळदे व त्यांच्यासोबत असलेल्या जिल्ह्यातील व मुंबईतील सर्व मैत्रिणींचा ग्रुप असुरक्षित कटरा कडे रवाना झाल्याची माहिती तुषार वाघुळदे यांनी दिली.
तसेच चाळीसगाव येथील रहिवाशी देवयानी ठाकरे या देखील काश्मीर येथे आहेत. आम्ही चाळीसगाववरून 14 लोक परवा पहलगाममध्ये येथे आलो, काल श्रीनगरमध्ये स्टे केला, त्यानंतर सोनबर्गला गेलो, मात्र या दुर्दैवी घटनेमुळे खूप घाबरलो आहोत. बाहेरची परिस्थिती पाहिली तर बाहेर हाय अलर्ट आहे. जागोजागी सैनिक तैनात आहेत. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणाहून जाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करत सध्या सुरक्षित असल्याची माहिती देवयानी ठाकरे यांनी दिली.