चोपड्याकडून अहमदाबादकडे जाणाऱ्या बसने दोघांना उडविले

शिरपूर : चोपड्याकडून अहमदाबादकडे जाणारी गुजरात राज्य परीवहन मंडळाच्या बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने शिरपूर तालुक्यातील तरडी येथील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. भागवत कालिदास पाटील (45) व विलास मंगल पाटील (40, रा.तरडी, ता.शिरपूर) असं अपघातातील मृतांचे नाव असून याबाबत थाळनेर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.

नेमकी काय आहे घटना?
शिरपूर तालुक्यातील तरडी येथील भागवत पाटील व विलास पाटील हे दोघे शनिवार, 10 जून रोजी रात्री 8.30 ते 9 वाजेदरम्यान दुचाकी (एम.एच.18 बी.एफ. 1887) ने बभळाजकडून तरडी गावाकडे जात असतांना बभळाज ते तरडी गावादरम्यान चोपड्याकडून अहमदाबादकडे जाणारी गुजरात राज्य परीवहन मंडळाच्या बसने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याने अपघात झाला.

या अपघातात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी होवून बेशुद्ध झाले. बभळाज व तरडी येथील ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी तपासून दोघांना मयत घोषित केले. अपघातानंतर काही वेळ वाहतूक ठप्प झाली.