H3N2 मुळे महाराष्ट्रात दोन जणांचा मृत्यू , आरोग्य मंत्र्यांनी दिल्या या सूचना

मुंबई – देशात कोरोनानंतर H3N2 चे संकट सुरू झाले आहे. H3N2 मुळे महाराष्ट्रातही दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता काळजी घेण्याच्या सूचना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिल्या आहेत. आरोग्यमंत्री म्हणाले की, आज आम्ही राज्यातील विभाग अलर्ट केलं आहे, यावरती असणारी गोळी डॉक्टरांच्या सल्ल्याने घेण्याचा सल्ला सावंत यांनी दिला. आमचा विभाग अलर्टमध्ये काम करत आहे. सर्वांनी काळजी घ्या, असंही मंत्री तानाजी सावंत म्हणाले.

गेल्या काही दिवसापासून देशभरात इन्फ्लूएंझा ए सब टाईप H3N2 च्या रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. दरम्यान, गेल्या सहा महिन्यांमध्ये विषाणूच्या पॅटर्नमध्ये लक्षणीय आणि अनपेक्षित बदल झाल्याची माहिती दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयातील आरोग्य तज्ज्ञांनी दिली. देशभरातील रुग्णालयांमध्ये H3N2 इन्फ्लूएंझाची हजारो रुग्णांची नोंद होत आहे. H3N2 विषाणूमुळे वैद्यकीय समस्या उद्भवत आहेत, प्रामुख्यानं फुफ्फुसांच्या संसर्गाचं कारण ठरत आहेत आणि या विषाणूनं गेल्या सहा महिन्यांमध्ये आपला पॅटर्नही बदलला असल्यानं या विषाणू बाबतची चिंता वाढल्याचं एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तात म्हटलंय.

अहमदनगर येथील चंद्रकांत सपकाळ वय २३ हा तरुण अलिबाग येथे फिरायला आला होता. यावेळी त्याला ताप आला होता, त्याला रुग्णालयात दाखल केले. १३ मार्च रोजी या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याला कोविड 19, H3N2 होता यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. नागपूर मधील एका ७२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दोघांचा मृत्यू H3N2 नेच झाला या संदर्भात अजुनही अहवाल आलेला नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली.