मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकाकडून सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५३ टक्क्यांवरुन ५५ टक्के इतकी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वाढीची रक्कम १ जानेवारी २०२५ ते ३१ जुलै २०२५ या कालावधीतील थकबाकीसह ऑगस्ट २०२५ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार असल्याचे वित्त विभागाच्या निर्णयात म्हटले आहे.
सातवा वेतन आयोग लागू असलेल्या सर्व राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ही वाढ मिळेल. यामुळे राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त १७ हजार कोटी रुपयांचा बोजा पडेल.
या शिवाय पाचवा व सहावा वेतन आयोग लागू असलेले काही कर्मचारी राज्यात आहेत. त्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. ही वाढ १ जानेवारी २०२५ ते ३१ जुलै २०२५ या कालावधीतील थकबाकीसह ऑगस्ट २०२५ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे.