उदय सामंतांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट….

नागपूर : शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी सध्या विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू आहे. राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने नागपुरमध्येच ही सुनावणी होत आहे. आज शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांची ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांच्याकडून उलट तपासणी झाली. यावेळी उदय सामंत यांनी सर्वात मोठा गौप्यस्फोट केला असून उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपसोबत सत्ता स्थापन करु असे आश्वासन दिले होते.. असा मोठा दावा त्यांनी केला आहे.

सुनावणीत काय घडलं?

शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी सध्या विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू आहे. आज (सोमवार, ११ डिसेंबर) शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांची ठाकरे गटाच्या वकिलांकडून फेरसाक्ष घेण्यात आली. यावेळी उदय सामंत यांनी महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aaghadi) सत्ता स्थापन होत असतानाच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट केला.

आजच्या सुनावणीत वकिल कामत यांनी उदय सामंत (Uday Samant) यांना “तुम्ही २०१९ ते जुन २०२२ पर्यंत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पद भुषवण्या इतपत नाराज होता का?” असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी हा दावा केला.

उदय सामंत यांचा गौप्यस्फोट…

“ज्यावेळी मी मंत्री पदाची शपथ घेतली त्यापूर्वी देखील गटनेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) साहेबांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही उद्धवजींना भेटलो होतो. त्यावेळी आम्हाला जी निवडणूक आपण नैसर्गिक युतीत लढलो. भविष्यात तशीच कार्यवाही नक्की होईल. पुन्हा काही कालावधीनंतर तुमची मागणी मान्य केली जाईल. भाजपसोबत (BJP) सरकार स्थापन केले जाईल, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले गेले. म्हणून मी मंत्री मंडळात सामील झालो…” असे ते म्हणाले.