उध्दव ठाकरे म्हणाले, म्हणून सरकारने मराठा आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला

मुंबई : मराठा आंदोलनावर लाठीचार्ज करण्यामागे नक्कीच कोणाचा तरी हात आहे. मला माहिती मिळाली आहे, की तिकडे ‘सरकारला आपल्या दारी थापा मारतं लय भारी’ हा कार्यक्रम घ्यायचा होता. आंदोलनकर्त्यांना तेथून उठवायचं होतं. त्यामुळेच या आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला, असा दावा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

सरकारकडून शासन आपल्या दारी कार्यक्रम घेण्यात येणार होता. त्यासाठी आंदोलनकर्त्यांना तेथून उठवायचं होतं. त्यामुळेच त्यांना उठा, उठा सांगण्यात आलं. आंदोलनकर्त्यांना त्यांच्या व्यथा सांगायच्या होत्या. कोणीतरी आपलं म्हणणं ऐकून घ्यावं अशी त्यांची इच्छा होती. त्यातून पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर लाठीमार सुरु झाला, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

वृद्ध महिलांवर घरात शिरुन लाठीमार करण्यात आला. पोलिस इतके राक्षस होऊ शकतात का? सरकार म्हणतंय सखोल चौकशी करु. आणखी किती सखोल जाणार. आरक्षण म्हणजे लोकांना न्याय हवा आहे. सगळ्यांना समान न्याय द्या. कायद्यासमोर सर्व नागरिक समान आहेत, असं ते म्हणाले.
गणपती 19 तारखेला येतायत. हे हिंदूत्ववादी सरकार आणि केंद्रात जगतगुरू बसलेले आहेत. याचं काय अडकलं आहे की खास अधिवेशन तिकडे त्यांना गणपती काळातच घ्यायचं आहे, असं ते म्हणाले.