महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात उद्धव ठाकरेंचा राजीनामा ठरेल कळीचा मुद्दा?

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आज सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाच्यावतीने वरिष्ठ वकील हरीश साळवे यांनी बाजू मांडली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यावर प्रश्न उपस्थित केले. यामुळे महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात उद्धव ठाकरेंचा राजीनामा कळीचा मुद्दा ठरेल, अशी शक्यता वर्तविण्यात येवू लागली आहे.

आज सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद करतांना हरीश साळवे यांनी राज्यातील सरकार कोसळण्याला उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचे म्हटलं. उद्धव ठाकरेंनी बहुमत चाचणीपूर्वीच राजीनामा दिला. त्यांना राज्यपालांनी बहुमत चाचणीसाठी बोलावलं होतं. २८ जून रोजी ही बहुमत चाचणी होणार होती. मात्र, त्यांनी त्यापूर्वी राजीनामा दिला. उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले असते, तर काही मुद्दे उपस्थित करता आले असते. उद्धव ठाकरेंचा राजीनामा अवैध ठरवला, तरच या चर्चांना अर्थ उरेल. त्यामुळे सरकार कोसळण्याला उद्धव ठाकरे जबाबदार आहेत, असा युक्तिवाद हरीश साळवे यांच्याकडून करण्यात आला.

कायदा पक्षांतर बंदीसाठी आहे, मतभेदांसाठी नाही. पक्षांतर बंदी कायद्यामुळे देशात पक्षांतर थांबलेलं नाही. पक्षाचा विश्वास गमावलेल्या नेत्यासाठी पक्षांतर विरोधी कायदा लागू होत नाही. यात राजकीय नैतिकतेचे अनेक पैलू आहेत. हा केवळ चर्चात्मक मुद्दा नाही, असेही हरीश साळवे म्हणाले. तसेच आमदारांना २५ जूनपर्यंत अपात्रतेची नोटीस बजावली होती. मात्र, विधानसभा उपाध्यक्षांनी त्यांना उत्तरासाठी पुरेसा वेळ दिला नाही, असा दावाही त्यांनी केला.