---Advertisement---
मुंबई : वाळू व इतर गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन, वापर, वाहतूक व तस्करीचे प्रकार राज्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. हे रोखण्यासाठी आताही अनधिकृतपणे वाहतूक करणाऱ्या वाहनांचा परवाना निलंबित करण्याचा आणि त्यांनतरही संबंधित अशी वाहतूक करतच असेल, तर थेट परवाना रद्द करण्याचा निर्णय राज्य परिवहन प्राधिकरणाने घेतला आहे. अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.
ते पुढे म्हणाले, महसुलाची तसेच पर्यावरणाची हानी टाळण्यासाठीही हे महत्त्वाचे ठरणार आहे. वाळू व इतर गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पहिल्या गुन्ह्यासाठी ३० दिवसांपर्यंत परवाना निलंबित व वाहन अटकवून ठेवण्याची कारवाई करण्यात येत आहे. अशा दुसऱ्या गुन्ह्यासाठी ६० दिवसांपर्यंत परवाना निलंबित व वाहन अटकवून ठेवण्यात येत आहे. तिसऱ्या गुन्ह्यासाठी वाहन अटकाव करून संबंधित प्रादेशिक परिवहन प्राधिकरणामार्फत परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
नियमाचा भंग करून सकल भारक्षमतेपेक्षा अतिरिक्त वजनाच्या वाळू व इतर गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या परवानाधारकांवरही विभागीय कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे कळसकर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या धोरणामध्ये एकसूत्रता आणण्यासाठी १८ ऑगस्टला झालेल्या बैठकीत वाळू व इतर गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन करून अवैधपणे वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या परवान्यावर कायद्यानुसार विभागीय कारवाई करण्यासाठी राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन प्राधिकरणांना विभागीय कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आल्याचेही यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.