वॉटरग्रेस कर्मचार्‍यांचा प्रताप : वजन वाढविण्यासाठी कचर्‍यात चक्क भरली माती

तरुण भारत लाईव्ह न्युज | जळगाव, १९ एप्रिल : साफसफाईचा कचरा भरताना त्यात वजन वाढविण्यासाठी चक्क माती भरली जात असल्याचा प्रकार बुधवारी निवृत्ती नगरात उघडकीस आला आहे. वॉटरग्रेस कंपनीकडून जळगावकरांच्या पैशाची लूट होत आहे. या प्रकारानंतर शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख नीलेश पाटील यांनी मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांच्या कानावर हा प्रकार घातला. भविष्यात असा प्रकार झाला तर मक्तेदाराला काळे फासण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे. दरम्यान, संबंधित मक्तेदाराला पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला असून, कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

वॉटरग्रेस कंपनीने शहरातील साफसफाईचा मक्ता घेतलेला आहे. त्यांच्या कर्मचार्‍यांकडून घरोघरी ओला व सुका कचरा संकलित केला जातो. त्याशिवाय कॉलनी व गल्ल्यांमध्ये उघड्यावर असलेला कचरा संकलित करून तो शहराच्या बाहेर टाकला जातो. कचर्‍याच्या एकूण वजनावर कंपनीला मोबदला अदा केला जातो. वॉटरग्रेस कंपनी व महापालिका यांच्यात कचर्‍याचा करार झालेला आहे. एका टनासाठी ९७० रुपये असा मोबदला देण्यात येतो. शहरातून एका दिवसाला ३१० टनापेक्षा जास्त कचरा संकलित होत असल्याचे दाखविले जाते. कचर्‍यात माती भरून वजन वाढविले जात असेल तर खरोखर कचरा किती असू शकतो, याचा अंदाज येतो. कचर्‍याच्या नावाने माती भरण्याचे उद्योग करून एक प्रकारे जनतेच्या पैशाची लूट होत आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख नीलेश पाटील यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन महापालिकेने करारनाम्यातील अटीशर्तीचे उल्लंघन केले म्हणून कंत्राटदारला जागेवरच पाच हजार रुपयांचा दंड केला आहे. त्याशिवाय त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याची असल्याची माहिती महापालिकेचे सहायक आयुक्त उदय पाटील यांनी दिली.

 

महापौर, उपमहापौरांचा सहभाग?

गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील कचरा उचलण्याचा मक्ता हा याच वॉटरग्रेस कंपनीकडे आहे. तरी पण शहरात जागोजागी कचर्‍याचे ढीग बघावयास मिळतात. याबाबत नागरिकांनी वारंवार प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्याकडे तक्रारी करूनही सोयीस्कररीत्या त्याकडे कानाडोळा केला जातो. अशाचप्रकारे ही कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून वजन वाढवून जनतेचा पैसे लुटत असून याची सखोल चौकशी व्हावी, अशी अपेक्षा आहे. याकडे महापौर, उपमहापौर देखील लक्ष देण्यास तयार नसून त्यांचाही यात सहभाग आहे का? असा माझा प्रश्न आहे. – नीलेश पाटील, जिल्हाध्यक्ष, शिवसेना (शिंदे गट), जळगाव