पाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार?, राज्यभरातून मनसैनिक मुंबईत दाखल

मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा गुढीपाडवा मेळावा आज शिवाजी पार्कवर होत आहे. या मेळाव्याला नाशिकहून तसंच इगतपुरी तालुक्यातून मनसैनिक मुंबईला रवाना झाले आहेत. त्यामुळे आजच्या सभेला चांगलीच गर्दी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मनसेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात सगळं बाहेर काढणार असल्याचा इशारा दिला होता. मशिदीवरील भोंगे, मुंबई महापालिका निवडणूक, शिवसेना, भाजप यासह राज्यातील राजकीय परिस्थितीवर राज ठाकरे भाष्य करण्याची शक्यता आहे.

मनसेचा शिवतीर्थवर मेळावा होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी या मेळाव्याला नाशिकहून तसंच इगतपुरी तालुक्यातून मनसैनिक मुंबईला रवाना झाले आहेत. तसेच शेकडो मनसैनिक रेल्वेने सुध्दा गेले असल्याची माहिती मनसेचे शहर अध्यक्ष दिलीप दातीर यांनी दिली आहे. राज्यभरात गुढीपाडव्याचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने दरवर्षी प्रमाणे यंदाही मनसेचा मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कमध्ये मेळावा होणार आहे. मुंबईला जाण्यापूर्वी मनसैनिकांनी नाशकात घोषणा दिल्या. त्यानंतर मनसैनिकांच्या वाहनाचा ताफा मुंबईला रवाना झाला.

आजच्या गुढीपाडवा मोठा उत्साहात साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे मेळावा घेत आहे. अवघ्या महाराष्ट्राला संबोधित करण्यासाठी राज ठाकरे सभा घेत असल्याने सभेला नाशिकहून देखील मनसैनिक रवाना झाले आहेत. जवळपास पाच हजाराहून अधिक मनसैनिक सभेला दाखल होणार असल्याचे मनसैनिकांनी सांगितले. तर यावेळी उपस्थित महिला कार्यकर्त्या म्हणाल्या की, आज मराठी संस्कृती जपणारा गुढीपापडावा सण असून देखील महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर सभेसाठी येत आहेत. नाशिक शहरातून हजारहून अधिक महिला सहभागी होणार असल्याचे महिला पदाधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान नाशिक ग्रामीण भागातून ही मोठ्या प्रमाणावर मनसैनिक मुंबईकडे रवाना होत असून हे मनसैनिक राजगड परिसरात जमण्यास सुरुवात झाली आहे. नाशिक ग्रामीण भागातील जवळपास चार ते पाच हजार मनसैनिक मुंबईत रवाना होणार असल्याची माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. दरम्यान मशिदीवरील भोंगे, मुंबई महापालिका निवडणूक, शिवसेना, भाजप यासह राज्यातील राजकीय परिस्थितीवर राज ठाकरे भाष्य करण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांच्या सभेसाठी राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते मुंबईत जमत आहेत. विशेषत: मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नाशिक-पालघरमधून कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात येत आहेत.