कसे असेल हवामान; जाणून घ्या सविस्तर

तरुण भारत लाईव्ह न्यूज : हवामान विभागाने देशातील काही राज्यात उष्णतेची लाट पसरण्याचा धोका वर्तविला आहे. उत्तर भारत, मध्य भारतासह देशातील काही राज्यात येत्या काही दिवसात तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. दिल्लीसह आजूबाजूच्या प्रांतात येत्या काही दिवसात तापमानात तीन डिग्री सेल्सिअस इतकी वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील जळगावातील तापमान 40 डिग्रीच्या पार गेले आहे. त्यामुळे जास्त उन्हात फिरू नये, पुरेसे पाणी सोबत असावे आणि नागरिकांनी उन्हाच्या झळांपासून पुरेशा संरक्षणाची तयारी करूनच घराबाहेर पडावे असे हवामान खात्याने म्हटले आहे.

भारतीय हवामान खात्याने देशातील काही राज्यात उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला आहे. उत्तर तटीय आंध्र प्रदेश आणि ओडीशा राज्यात शनिवार (१५ एप्रिल) पर्यंत बिहारमध्ये शनिवार ते सोमवार (१५ते १७ एप्रिल) पर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पश्चिम बंगालच्या वेगवेगळ्या क्षेत्रात सोमवारपर्यंत उष्णतेची लाट असणार आहे. महाराष्ट्रातही जळगाव, चंद्रपूर, ब्रह्मपूरी, अकोला, गोंदिया या ठिकाणचे तापमान ४० डिग्रीच्या पुढे गेले आहे. महाराष्ट्रात जरी काही ठिकाणी पाऊस पडला असलातरी येत्या काही दिवसात तापमान वाढण्याची शक्यता आहे. आयएमडीचे कुलदीप श्रीवास्तव यांनी येत्या काही दिवसात दिल्लीसह देशातील काही राज्याचे तापमान वाढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राजधानी दिल्लीत पारा 40 डिग्रीच्या पुढे जाऊ शकतो असे हवामान खात्याने म्हटले आहे.

बिहारमध्ये शनिवार पासून ते सोमवारपर्यंत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानूसार मध्य आणि उत्तर भारतात सध्या असलेल्या तापमानात वाढ होऊन ते 40 ते 42 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहण्याची शक्यता आहे.पश्चिम हिमालयी क्षेत्रातील काही भाग आणि उत्तरपूर्व भारत, पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओडीशा, आंध्रप्रदेशची किनारपट्टी आणि केरळात कमाल तापमान सामान्यपेक्षा तीन ते पाच डिग्री सेल्सिअस जादा नोंदले जात आहे. हवामान विभागाने पश्चिम बंगाल, ओडीशा आणि आंध्रप्रदेशात 20 ते 26 एप्रिल दरम्यान उष्णतेची लाट पसरण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात तापमान वाढणार आहे.