२००० रुपयांची नोट मागे का घेतली? आरबीआयने सांगितलं कारण…

मुंबई : २ हजार रुपयांची नोट वितरणातून मागे घेण्यात येत असल्याचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी अचानक जाहीर केला. या नोटा बदलून घेण्यास अथवा बँकेत जमा करण्यास नागरिकांना ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी केंद्र सरकारने ५०० आणि १,००० रुपयांच्या नोटा एका रात्रीत बंद केल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा २ हजार रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे. हा निर्णय का घेतला, या मागील कारण आरबीआयने स्पष्ट केलं आहे.

रिझर्व्ह बँकेने निवेदनात म्हटले आहे की, २ हजारांच्या नोटा जारी करणे तत्काळ थांबविण्याचे आदेश बँकांना दिले आहेत. ‘स्वच्छ नोट धोरणा’चा पाठपुरावा म्हणून २ हजारांची नोट चलनातून मागे घेण्यात येत आहे. वास्तविक, ही नोट तशी फारशी चलनात नव्हती. काळा पैसा साठवून ठेवण्यासाठी २ हजारांच्या नोटेचा मोठ्या प्रमाणात वापर होत होता. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने या नोटेची छपाई २०१८-१९ मध्येच बंद केली होती.

मोदी सरकारने ५०० आणि १,००० रुपयांच्या नोटा बंद केल्या होत्या. मोठ्या संख्येने नोटा चलनातून अचानक बाद झाल्यामुळे अर्थव्यवस्थेची गती कायम ठेवण्यासाठी मोठ्या चलनी नोटेची गरज होती. त्यामुळे २ हजारांची नोट सरकारने चलनात आणली होती. आता २ हजार रुपयांच्या नोटांचा व्यवहारातील वापर कमी झाला आहे. तसेच इतर नोटांचा साठा जनतेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसा आहे.

चलनातून मागे घेण्यात आलेल्या २ हजार रुपयांच्या नोटा नागरिकांना २३ मे २०२३ पासून बँकांमध्ये बदलून देण्यास सुरुवात केली जाईल. ही प्रक्रिया ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत सुरू राहील. आरबीआयच्या १९ विभागीय शाखांमध्येही २० हजार रुपयांपर्यंतच्या नोटा बदलून मिळतील. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. सध्या एकाच वेळी २० हजार रुपयांची मर्यादा आहे. म्हणजे एका वेळी १० नोटा बँकांमध्ये जमा करता येतील. बँक खात्यात जर २००० च्या नोटांच्या स्वरुपात रक्कम जमा करायची असेल, तर त्यावर कोणतीही मर्यादा घालण्यात आलेली नाही.

काँग्रेस म्हणाली- बंद करायचीच होती मग आणली कशाला?

आरबीआयच्या या निर्णयानंतर आरोप-प्रत्योराप सुरू झाले. आरबीआयच्या नोटबंदीच्या निर्णयावर काँग्रेसनेही टीका केली. नोटा बंद करायच्या होत्या मग का आणल्या, असा सवाल काँग्रेसने केला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले की, जर २००० रुपयांची नोट बंदी करायची होती, तर ती का आणली गेली? २००० ची नोट आधीपासून चलनात आली नसेल तर यावरही उत्तर द्यायला हवे. दोन हजार रुपयांच्या नोटा बाजारातून कशा गायब झाल्या हेही सरकारने सांगावे, असंही ते म्हणाले. काँग्रेस नेते राजीव शुक्ला म्हणाले की, अशा निर्णयांमुळे अर्थव्यवस्था मजबूत होण्याऐवजी कमकुवत होते. काँग्रेस नेते गौरव बल्लभ म्हणाले की, भाजपने विचार न करता २००० ची नोट बाजारात आणली, आता ती बंद करत आहेत.