जागतिक चिमणी दिन का साजरा केला जातो; जाणुन घ्या सविस्तर

तरुण भारत लाईव्ह । २० मार्च २०२३। २० मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून पाळला जातो. पहिला जागतिक चिमणी दिवस हा २० मार्च २०१० रोजी साजरा करण्यात आला. आज चिमण्यांची संख्या कमी होत चालली आहे. खरं म्हणजे भारतात सगळीकडे सर्वात जास्त संख्येने सापडणारा, विणीचा हंगाम वर्षभर असू शकणारा, माणसाच्या जवळपास राहणारा आणि त्यामुळे नेहमी दिसणारा पक्षी अशी चिमणीची ओळख आहे. परंतु दिवसेंदिवस होत चालल्या बदलामुळे आता चिमण्यांच्या वास्तव्याला धोका निर्माण झाला आहे. यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी २० मार्च हा दिवस ‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून  साजरा केला जातो.

भारतात पाच प्रजातींच्या चिमण्या आढळून येतात. त्यामध्ये, स्थलांतर करणाऱ्या प्रजातींचादेखील समावेश आहे. या‌शिवाय, जगातही २४ प्रकारच्या चिमण्या आढळून येतात. यापैकी बहुतांश प्रजातींची कोणतीही आकडेवारी उपलब्ध नाही. २०२० मध्ये गुजरातच्या गांधीनगर येथे झालेल्या १३व्या संयुक्त राष्ट्र प्रवासी पक्षी प्रजाती संवर्धन परिषदेत भारतातील पक्ष्यांची सध्याची स्थितीवरील ‘स्टेट ऑफ इंडियाज बर्ड’ अहवाल प्रकाशित करण्यात आला. देशभरातील दोन सरकारी आणि सहा स्वयंसेवी संस्था आणि अनेक पक्षी निरीक्षकांनी ‘सिटिझन सायन्स’ या संकल्पनेचा वापर करून हा अहवाल तयार केला आहे. पंधरा हजार पाचशे पक्षी निरीक्षकांच्या सुमारे एक कोटी निरीक्षणांच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला. प्रकाशित अहवालात पक्षांच्या ८६७ प्रजातींचा समावेश करण्यात आला होता. या अहवालामध्ये असे म्हटले आहे की गेल्या २५ वर्षात आतापर्यंतची पक्षांच्या संख्येत सर्वात मोठी घट नोंदविली गेली आले. गेल्या पाच वर्षात पक्ष्यांच्या संख्येत तब्बल ७९% घट झाल्याचेही या अहवालात म्हटले आहे. त्यातही कीटकभक्ष्यी असलेल्या चिमणीसारख्या पक्षांची संख्या कमी होणे, हे मानवासाठी धोकादायक असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. ८६७ पैकी १२६ प्रजाती अशा आहेत ज्यांचे प्रमाण स्थिर स्वरूपात असल्याचे आढळून आले आहे आणि काही ठिकाणी वाढलेलीही दिसते. मात्र, १०१ पक्ष्यांच्या प्रजातींच्या संवर्धनासाठी ताबडतोब प्रयत्न करण्याची गरज आहे, ज्यामध्ये चिमणी या पक्षाचा समावेश आहे. चिमण्यांची संख्या शहरी भागातून मोठ्या प्रमाणात कमी झाली असून ग्रामीण भागातही चिमण्यांचे प्रमाण कमी होत चालल्याचे या अहवालात म्हटले आहे.

 

चिमण्या कमी होण्याची कारणे:

१.उद्योगीकरणामुळे वातावरणात झालेला बदल आणि वाढते प्रदूषण.

२.शहरीकरण व लोकांचे बदलते राहणीमान, फ्लॅट संस्कृतीतील सिमेंटची घरे यामुळे चिमण्या आपली घरे बनवू शकत नाहीयेत. आधीच्या काळात कौलारू घरं व त्यासमोर असणाऱ्या विहीर यामुळे चिमण्यांना आपले घर बनविणे अतिशय सोपे होते. बदलत्या बांधकामाच्या पद्धतीमूळे पक्षांच्या निवासावर देखील परिणाम होत आहे.

३.कमी होत चाललेली जंगले आणि शहरात निर्माण झालेली मोबाईल टॉवर्स व तारांची जंगले

४.शेतात होणाऱ्यी हानीकारक रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वारेमाप वापर, असले धान्य खाऊन चिमण्या मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.

५.विणीच्या हंगामात (प्रजननकाळात) चिमण्यांना मानवी आणि तंत्रज्ञानातील बाबींचा होणारा त्रास.

६.वाहनं आणि गर्दीचा गोंगाट यामुळेही देखील चिमण्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

७.पाणथळीच्या जागा नष्ट झाल्याने पूर्वीचे अनेक पक्षी आता दिसत नाहीत.

८.जंगल तोडीमुळे चिमण्यांची घरटे नष्ट होतात.

 

चिमण्यांच्या संवर्धनाचे उपायः

१.पक्षांच्या पाण्याच्या सोयीसाठी पाणथळीच्या जागांची निर्मिती करणे व त्यासोबतच धान्य सुद्धा उपलब्ध करून देणे. उरलेले अन्न पक्षांना टाकणे. आपल्या घराजवळ, बाहेर चिऊताईसाठी दाणा-पाणी ठेवणे अशा गोष्टी प्रत्येक जण करू शकतो.

२.पक्षांच्या वावरासाठी नैसर्गिक परिवास निर्माण करणे.

३.शेतीसाठी नीकारक रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर कमी करणे.

४.‘जागतिक चिमणी दिन’ या दिवशी लोकांमध्ये चिमणी वाचविण्यासाठीची जागृती करणे, तिचे अन्नसाखळीतील- पर्यायाने पर्यावरणातील महत्त्व समजावणे, चिमणीला जगण्यासाठी योग्य अशी परिस्थिती निर्माण करणे.

५.चिमणीला बाभळीसारख्या नैसर्गिक अधिवासाबरोबरच घरटे बांधण्यास अनुकूल गोष्टी उपलब्ध करून देणे, घराभोवती शक्य असल्यास छोटी झाडेझुडुपे लावणे