अखेर ना. अनिल पाटलांच्या प्रयत्नांना यश; शेतकऱ्यांनी मानले आभार

जळगाव : पीक विम्यापासून वंचीत असलेल्या अमळनेर तालुक्यातील पाच हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यासाठी सुरुवात झाली आहे. ना. अनिल पाटील यांनी यासाठी सतत पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहे.

अमळनेर तालुक्यातील सर्वच महसूल मंडळातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्याची अग्रिम रक्कम मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नांनी मिळाली होती. मात्र त्यात पातोंडा मंडळाची यादी स्कॅन करण्याची राहून गेल्याने या मंडळातील पाच हजार शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले होते. त्याबाबत त्यांनी मंत्री अनिल पाटील यांच्याकडे फिर्याद मांडली.

त्याबाबत मंत्री अनिल पाटील ओरिएंटल इन्श्युरन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना तसेच जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. त्यानंतर आता पातोंडा मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अखेर हेक्टरी साडे आठ हजार रुपये प्रमाणे रक्कम जमा होणे सुरू झाले आहे.

पातोंडा मंडळासाठी सहा कोटी रुपये अनुदान प्राप्त झाले असून सदर शेतकऱ्यांनी मंत्री अनिल पाटील यांचे आभार मानले आहेत. तर मंत्री अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री सह पालकमंत्री यांचे आभार मानलेत.