अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी, दोघांना अटक

मुंबई: ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची काल(गुरूवारी) मुंबईमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. फेसबुक लाईव्ह दरम्यान घोसाळकर यांची ५ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, या घटनेने मुंबईसह राज्यात एकच खळबळ उडाली आहे. स्वत:ला सामाजिक कार्यकर्ता म्हणवणारा मॉरिस नोरोन्हा याने घोसाळकर यांची हत्या केली, त्यानंतर स्वत:वर गोळ्या झाडून त्यानेही आपलं जीवन संपवलं. या प्रकरणात पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्ये प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. तसेच १ पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसंही जप्त केले आहे.मिळालेल्या माहितीनुसार अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात पोलिसांनी मॉरिस नोरोन्हा उर्फ मॉरिस भाईचा पीए मेहूल पारिख आणि रोहित साहू या दोघांना ताब्यात घेतलं आहे. अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार होण्यापूर्वी मॉरिस भाई आणि अभिषेक घोसाळकर यांच्यात झालेल्या संभाषणामधून मेहूल पारिख याच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला होता. आता ताब्यात घेतलेल्यांची पोलिस कसून चौकशी करत आहेत.या दोघांकडून काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्य सरकारनेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री यासंबधीची चर्चा केली आहे. तसेच या घटनेमागचं नेमकं कारण काय याची माहिती फडणवीस यांनी पोलिसांकडून घेतली आहे. अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणाची गृह मंत्र्यांनी पोलिसांकडून माहिती घेतली आहे. नेमकं प्रकरण कोणत्या वादातून घडलं याची माहिती घेतली घेतली असल्याची माहिती आहे. रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही देवेंद्र फडणवीस यांनी गोळीबार प्रकरणी चर्चा केल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यात वर्षा निवासस्थानी जवळपास अर्धा तास चर्चा झाली आहे. आठवड्याभरात दुसरे गोळीबार प्रकरण समोर आल्याने विरोधकांकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.