अहमदनगर रेल्वे स्थानकाला ‘अहिल्‍यानगर’ नाव देण्‍यास केंद्रीय रेल्‍वे मंत्रालयाने दिला हिरवा झेंडा

अहमदनगर : मागील अनेक वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याची मागणी केली जात होती. अहमदनगर जिल्ह्याचे नाव ‘अहिल्यानगर’ करण्याची देखील मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून ‘अहिल्यानगर’ झाल्याची घोषणा केली होती.

अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरमधील चौंडी या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये केली होती. यानंतर अहमदनगर जिल्ह्याचे नाव ‘अहिल्यानगर’ करण्याचा ठराव महापालिकेत मांडण्यात आला. अहमदनगर महापालिका प्रशासक सर्वसाधारण सभेकडून नामांतर प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. महापालिकेनंतर आता जिल्‍ह्याला अहिल्‍यानगर नाव देण्‍यास केंद्रीय रेल्‍वे मंत्रालयाने हिरवा कंदिल दिला आहे.

जिल्‍ह्याच्‍या नामांतराचा मार्ग सुकर
आता जिल्‍ह्याला अहिल्‍यानगर नाव देण्‍यास केंद्रीय रेल्‍वे मंत्रालयाने हिरवा कंदिल दिला असून, हे नाव देण्‍यास विभागाची कोणतीही हरकत नसल्‍याचे पत्र दिल्‍याने जिल्‍ह्याच्‍या नामांतराचा मार्ग सुकर झाला असल्‍याचे महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी सांगितले. जिल्‍ह्याला पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकरांचे नाव देण्‍याची मागणी झाल्‍यानंतर राज्‍यातील महायुती सरकारने अहिल्‍यानगर असे नाव देण्‍याचा महत्‍वपूर्ण निर्णय घेतला.

अहिल्‍यानगर नावास मान्‍यता
नामांतराच्‍या बाबतीतील सर्व प्रक्रिया ही केंद्र सरकारच्‍या अखत्‍यारीत पूर्ण होत असल्‍याने प्रत्‍येक विभागाची ना हरकत आवश्‍यक असते. केंद्रीय रेल्‍वे मंत्रालयाने नामांतराच्‍या बाबतीत हरकत नसल्‍याचे पत्र जारी करुन, अहिल्‍यानगर नावास मान्‍यता दिली आहे. या नावाचे कोणतेही रेल्‍वेस्‍थानक देशात नसल्‍याचेही त्‍यांनी आपल्‍या पत्रात नमुद केल्‍याने जिल्‍ह्याला अहिल्‍यानगर नाव देण्‍यातील पहिला टप्‍पा पूर्ण होत असल्‍याचेही मंत्री विखे पाटील यांनी म्हटले आहे.

गोपीचंद पडळकरांनी केली होती मागणी
दरम्यान, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून सतत अहमदनगरचे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ असे नामांतर करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, गतवर्षी चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या २९८ व्या जयंती सोहळ्यात बोलतांना देखील त्यांनी ही विनंती केली होती. याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नामांतराची घोषणा केली होती.