आघाडीत चाललंय काय ? आता काँग्रेसचाही स्वबळाचा नारा ? २८८ जागा लढण्याबाबत काँग्रेस नेत्याचं मोठं विधान

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत. राज्यात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचा उत्साह दुणावला आहे. या निकालानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून स्वबळाची भाषा येताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यांनी राज्यातील २८८ मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करण्याचे आदेश शिवसैनिकांना दिले. त्यानंतर काँग्रेसमधूनही मोठी प्रतिक्रिया आली आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागताच महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ -छोटा भाऊवरून वाद झाला. त्यानंतर काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या नेत्यांकडून सारवासारवही करण्यात आली. हा वाद थांबत नाही तोच उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना २८८ जागांवर तयारी करण्याचे आदेश दिले. विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या या विधानाने महाविकास आघाडीत खळबळ उडालेली असतानाच आता काँग्रेसमध्येही स्वबळाचा नारा घुमू लागला आहे. काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने महाविकास आघाडीने २८८ जागांवर मैत्रीपूर्ण लढत करण्याचं विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विधासनभा निवडणुकीत महाविकास आघाडी राहणार की जाणार? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

काँग्रेस नेते अभिजीत वंजारी यांनी उद्धव ठाकरे यांच्या प्रतिक्रियेनंतर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणुकीत काय करायचं हा प्रश्न आमच्या लेव्हलचा नाहीये. महाविकास आघाडीचे नेतेच ते ठरवतील. पलिकडे तीन पक्ष आहेत. इकडेही तीन पक्ष आहेत. जागा वाटप करताना अनेकदा चांगल्या कार्यकर्त्यांचं नुकसान होतं. त्यामुळे जर 288 जागांवर मैत्रीपूर्ण लढत देण्याचा विचार आला तर नक्की लढलं पाहिजे, असं अभिजीत वंजारी यांनी म्हटलं आहे.

उमेदवार मिळवण्यात अडचण नाही
२८८ जागा लढवण्यासाठी काँग्रेसकडे तेवडे उमेदवार आहेत का? असा सवाल वंजारी यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी उत्तर दिलं. आमच्याकडे २८८ जागांवर लढण्यासाठी उमेदवार आहेत. आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत. सर्वाधिक संख्या असलेला पक्ष आमचा आहे. विलासराव देशमुख यांच्या काळातही आमचे सर्वाधिक आमदार निवडून आले होते. आमचं वलय आणि वचर्स्व होतं. २८८ उमेदवार मिळण्यास आम्हाला काही अडचण नाहीये, असं अभिजीत वंजारी म्हणाले.

ठाकरे काय म्हणाले?
दरम्यान, लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत जिल्हाप्रमुखांनी घेतलेल्या कष्टाबद्दल अभिनंदन केलं. विधानसभा निवडणुका अवघ्या चार महिन्यावर आहेत. दिवस फार कमी आहे. त्यात पाऊस आणि शेतीची कामेही आहेत. असं असलं तरी आपली संघटना मजबूत करण्यासाठी कामाला लागा. आतापासूनच विधानसभेची तयारी करा. सर्वच्या सर्व २८८ मतदारसंघांची तयारी करा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यामुळे काँग्रेसमधून ही प्रतिक्रिया उमटली आहे.