इस्रायल-हमास संघर्ष आणि भारताची भूमिका !

पॅलेस्टाईनमधल्या हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर हल्ला चढवल्यानंतर जागतिक शांतता धोक्यात आली असून तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अद्याप संपले नसताना हमास आणि इस्रायलमधील संघर्षामुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या खाईत तर लोटले जाणार नाही ना, अशी भीती निर्माण झाली आहे. हमासने इस्रायलवर केलेला हल्ला आणि रशियाने युक्रेनवर केलेला हल्ला वरकरणी सारखा वाटत असला, तरी यात खूप मोठा फरक आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष हा दोन देशातील युद्ध आहे.मात्र, हमास आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाला युद्ध म्हणता येणार नाही तर एका दहशतवादी संघटनेने दुसऱ्या देशावर चढवलेला हल्ला म्हणून त्याकडे पाहावे लागले.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धात कोण चूक कोण बरोबर, याचा निर्णय सापेक्ष आहे. कोणी या युद्धात रशियाची बाजू घेऊ शकतो तर कोणी युक्रेनची. तुम्ही तुमच्या डोळ्यावर जसा चष्मा लावाल, तसे तुम्हाला दिसणार आहे. तुमच्या चष्माच्या नंबरवर तुम्हाला समोरचे जग दिसणार आहे. आपल्या देशाच्या सार्वभौमतेच्या रक्षणासाठी इस्रायलने गाझापट्टीला युद्धक्षेत्र घोषित करीत हमासविरुद्ध युद्ध पुकारले आहे. इस्रायलला आपल्या देशाची सीमा तसेच देशाची एकता आणि अखंडता यांचे रक्षण करण्याचा अधिकार आहे, त्याच्या या अधिकाराला कोणी आव्हान देऊ शकत नाही वा इस्रायलवर दोषारोपणही करता येणार नाही. यावेळी इस्रायलवर पहिला हल्ला हमास या पॅलेस्टाईनमधल्या दहशतवादी संघटनेने केला. इस्रायल पूर्णपणे बेसावध असताना हमासने असा हल्ला केल्यामुळे सुरुवातीला इस्रायली सैनिकांसह अनेक निरपराध नागरिकांचेही यात मोठ्या प्रमाणात बळी गेले.

हमासचा हा हल्ला म्हणजे इस्रायली गुप्तचर संस्था मोसादचे अपयश मानले जात आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी अनेक इस्रायली सैनिकांसह इस्रायली महिला, मुलं आणि ज्येष्ठांसह निष्पाप नागरिकांना ओलिस धरले. इस्रायलच्या सीमावर्ती भागात घुसून हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायली जनतेवर केलेला अत्याचार अतिशय निषेधार्ह तसेच मानवतेच्या विरोधातील म्हणावा लागेल. इस्रायलच्या प्रतिहल्ल्यात हमासच्या दहशतवाद्यांसह पॅलेस्टाईनमधल्या अनेक नागरिकांचाही बळी गेला. इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षात भारताने इस्रायलची बाजू घेतली असल्याचे वरकरणी दिसत असले, तरी भारताने इस्रायलवर दहशतवादी हल्ला झाल्यामुळे इस्रायलला आपला पाठींबा जाहीर केला आहे.जगाच्या कोणत्याही भागात झालेला दहशतवादी हल्ला हा निषेधार्हच असतो, ही भारताची भूमिका सुरुवातीपासूनचीच आहे. त्यामुळे ज्या कोणत्या देशात दहशतवादी हल्ला होईल, भारत त्या देशासोबत उभा राहतो.

कारण, दहशतवादाची जेवढी किंमत आतापर्यंत भारताला चुकवावी लागली तेवढी खचितच जगातील दुसèया कोणत्या देशाला चुकवावी लागली असेल. त्यामुळे इस्रायलवरील हमासच्या हल्ल्याचा निषेध करण्याची भारताची भूमिका ही स्वाभाविक आणि नैसर्गिक अशी म्हणावी लागेल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारताने पॅलेस्टाईनमधल्या हमास या दहशतवादी संघटनेचा निषेध केला आहे, पॅलेस्टाईनचा निषेध केला नाही. त्यामुळे अशी भूमिका घेत भारताने आपल्या संयमित आणि संतुलित परराष्ट्र धोरणाचा जगाला परिचय करून दिला, असे म्हटले तर ते चूक ठरणार नाही. इस्रायलने कोणतीही आगळीक केली नसताना हमासने इस्रायलवर हल्ला चढवला आहे. त्यामुळे इस्रायलने चवताळून उठणे स्वाभाविक आहे.सापाच्या शेपटीवर पाय दिल्यावर तो जसा फणा उगारतो, तशी इस्रायलची प्रतिक्रिया उमटली, ती पूर्णपणे स्वाभाविक आहे. इस्रायल हा तसा आधीपासूनच आक्रमक वृत्तीचा देश आहे. त्यामुळेच चारी बाजूने अरब देशांनी घेरला गेला असतानाही इस्रायलने आपले अस्तित्व टिकविले आहे. इस्रायली नागरिकांमधील राष्ट्रवादाची भावना अतिशय तीव्र आहे.

अनेक बाबतीत इस्रायलने जगासमोर आदर्श ठेवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये देशाचे पंतप्रधान म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर जगात भारताचा दबदबा वाढला आहे. सारे जग भारताकडे मोठ्या आशेने पाहत आहे, याचे श्रेय मोदी यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाला निर्विवादपणे द्यावे लागेल. भारताच्या या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांचाही उल्लेख करावा लागेल. जयशंकर यांनी आधी परराष्ट्र सचिव म्हणून काम केले आहे. देशाचे परराष्ट्र धोरण ठरवताना जयशंकर यांनी परराष्ट्र सचिव म्हणून केलेल्या कामाच्या अनुभवाचा फायदा देशाला मिळाला, हे मान्य करावेच लागेल. भारताला अटलबिहारी वाजपेयी, सुषमा स्वराज, जसवंतसिंग, यशवंत सिन्हा अशी परराष्ट्र मंत्र्यांची परंपरा लाभली आहे. नोकरशाहीवर विश्वास टाकून मोदी काम करतात, सरकार चालवतात, असा आक्षेप त्यांच्यावर घेतला जातो. पण मोदी यांच्या याच भूमिकेमुळे भारताचे परराष्ट्र धोरण जगात यशस्वी ठरले आहे.भारताची विश्वगुरूच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.

योग्य व्यक्तीकडे योग्य पद सोपविण्यात मोदी यांचा हातखंडा आहे. त्याचेच हे द्योतक म्हणावे लागेल. इस्रायलमध्ये अडकलेल्या २३० भारतीयांना ऑपरेशन अजयच्या माध्यमातून परत आणण्यात परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांची शिष्टाई यशस्वी ठरली आहे. याआधी विविध कारणांनी अनेक देशात अडकलेल्या भारतीय लोकांना भारतीय वायुदलाच्या जवानांनी आपला जीव धोक्यात टाकत परत आणले आहे. युद्धग्रस्त भागातून आपल्या नागरिकांना सुखरूप परत आणणे हे काम वाटते तितके सोपे नाही. हमासच्या हल्ल्यामुळे चवताळलेल्या इस्रायलने हमासचा पूर्ण बीमोड करण्याचा चंग बांधला आहे. इस्लामिक स्टेटला (इसिस) आम्ही जसे चिरडले तसे हमासलाही चिरडून टाकू या जिद्दीने इस्रायल या लढाईत उतरला आहे. तो हमासला संपवणार याबद्दल कोणाच्याच मनात शंका नाही. आपल्या याच आक्रमक भूमिकेचाच भाग म्हणून इस्रायलने गाझापट्टीवर अनेक निर्बंध लादले.गाझापट्टीचा वीज आणि पाणी पुरवठा खंडित केला. इंधनाचा, अन्नधान्याचा, भाजीपाला आणि औषधांचा पुरवठा थांबवला.

हमासची कोंडी करण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाचा फटका हमासच्या दहशतवाद्यांसोबत तेथील सर्वसामान्य नागरिकांनाही बसला. लहान मुले, महिला, वृद्धांचे जीवन दयनीय झाले, त्यांच्या यातनांना पारावर उरला नाही. कोणत्याही युद्धात सर्वसामान्य माणूसच भरडला जात असतो, हे त्रिकालाबाधित सत्य आहे, याचा ताजा अनुभव गाझापट्टी तसेच इस्रायलमधील नागरिकांना पाहून येत आहे. मात्र, यासाठी इस्रायलला फारसा दोष देता येणार नाही. हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलच्या सीमावर्ती भागात घुसून जे अनन्वित अत्याचार केले ते पाहून तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहात नाही. जिवंत माणसे तर सोडा; पण हमासच्या दहशतवाद्यांनी मृतदेहांची ज्या पद्धतीने विटंबना केली ते पाहून इस्रायलची ही कृती काहीच नाही, असे म्हणावेसे वाटते. सभ्य समाजात ज्या गोष्टींना जागा नसते, अशा गोष्टी आज हमास तेथे करत आहे. मात्र, रशिया आणि इराणसह अनेक देश हमासची बाजू घेत इस्रायलवर दोषारोपण करीत आहे. अमेरिकेने इस्रायलची बाजू घेतली आहे.

इस्रायलला आर्थिक आणि लष्करी मदतीचा ओघ सुरू केला आहे. या पृष्ठभूमीवर भारताची भूमिका ही योग्य म्हणावी लागेल. भारताला इस्रायलबद्दल जसे प्रेम आहे, तसेच भारताच्या मनात पॅलेस्टाईनबद्दलही आदराची भावना आहे. पॅलेस्टाईन मुक्ती संघटनेचे यासर अराफत आणि भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यात सौहार्दाचे संबंध होते.हमास या दहशतवादी संघटनेला पॅलेस्टाईनमधील सरकारचा तसेच तेथील लोकांचाही पाठींबा नाही. पॅलेस्टाईनच्या समस्येवर आज ना उद्या जगाला मार्ग काढावाच लागणार आहे. आपण आपल्या कृतीने पॅलेस्टाईनची बाजू घेत नाही, तर त्यांची स्थिती आणखी अडचणीची करत आहे, याचे भान हमासने ठेवले असते, तर आज ही स्थिती उद्भवली नसती.