उबाठा गटाला लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाले असून त्यांचे तीन खासदार निवडून आले आहेत. यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी खोचक टीका केली.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात घवघवीत यश मिळाले असून महाविकास आघाडीच्या ३० जागा निवडून आल्या आहेत. तर विशाल पाटील सांगलीतून अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे महायुतीला केवळ १७ जागा मिळू शकल्या आहेत. मुंबईतही उबाठा गटाने जोरदार कामगिरी केली असून चार पैकी तीन जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसने दोन पैकी एका जागेवर विजय मिळविला आहे. मुंबईत महायुतीचे पानिपत झाल्यानंतर आता मनसेकडून यावर भाष्य करण्यात आले आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी एक्सवर पोस्ट टाकत उबाठा गटाच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
संदीप देशपांडे एक्सवरील पोस्टमध्ये म्हणाले, “उ.बा.ठा चा मुंबईत झालेला विजय हा भगवा नाही तर हिरवा विजय आहे.” मुंबईत झालेला पराभव हा महायुती आणि मनसेच्या जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. राज ठाकरे यांनी ज्या ज्या ठिकाणी सभा घेतल्या, त्या त्या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांचा विजय झाला, असा दावा मनसेचे दुसरे नेते गजानन काळे यांनी केला होता. मात्र राज ठाकरे यांनी दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरही सभा घेतली होती. पंतप्रधान मोदींसह महायुतीचे अनेक बडे नेते या सभेला उपस्थित होते, तरीही दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात उबाठा गटाचे नेते अनिल देसाई यांचा विजय झाला आहे. दादरचा भाग याच मतदारसंघात येतो.