उबाठा गटाला मराठी माणसाचं मतदान नाही, विधानसभेसाठी राज ठाकरेंनी केली २००-२५० जागा लढण्याची पहिली गर्जना,

राज्यातील सर्वच जागांवर तयारी करण्याचे मनसे अध्यक्षांचे पदाधिकारी नेत्यांना आदेश. राज्यातील सर्वच जागांवर तयारी करण्याचे मनसे अध्यक्षांचे पदाधिकारी नेत्यांना आदेश

 

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मुंबईच्या रंगशारदा सभागृहात ही बैठक पार पडली. यावेळी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण भाष्य केले. मी कोणाकडे जागा मागायला जाणार नाही. आपण २०० ते २५० विधानसभेच्या जागांवर लढण्याची तयारी करतोय, असे राज ठाकरे यांनी सांगितले. राज ठाकरे यांच्या या घोषणेमुळे मनसेचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांच्या मनसेने खरोखरच २०० ते २५० मतदारसंघात निवडणूक लढल्यास विधानसभेला चुरस वाढू शकते. मात्र, लोकसभेला महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरे हे शेवटपर्यंत आपला निर्णय कायम ठेवणार का, हे आगामी काळात स्पष्ट होईल.

यावेळी राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीतील ठाकरे गटाच्या कामगिरीवरही टिप्पणी केली. त्यांनी म्हटले की, लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना झालेले मतदान हे मराठी माणसाचे नाही. लोकांच्या मनात उद्धव ठाकरे यांच्याविषयी राग आहे. उद्धव ठाकरेंना झालेले मतदान हे मोदींविरोधात मतदान आहे. त्यामुळे आता जनता मनसेची वाट पाहत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप ठरलेले नाही. मी कोणाकडे जागा मागायला जाणार नाही. आपण विधानसभेला २०० ते २५० जागांवर निवडणूक लढण्याची तयारी करत आहोत, असे राज ठाकरे यांनी मनसेच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सांगितले. राज ठाकरे यांचे हे वक्तव्य पाहता मनसे पक्ष विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची शक्यता आहे.