काँग्रेसची भारत जोडो यात्रा उद्या नंदुरबारात, आदिवासी न्याय यात्रा या नावाने सुरुवात करणार

नंदुरबार /तळोदा : काँग्रेसची भारत जोडो यात्रा १२ मार्चला नंदुरबारात येईल.यावेळी खासदार राहुल गांधी उपस्थित राहतील, अशी माहिती माजी मंत्री तथा आमदार अॅड. के. सी. पाडवी यांनी पत्रकार परिषदेत दिली. काँग्रेस पक्षाचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली भारत जोडो यात्रा सध्या गुजरातमध्ये सुरू आहे. १० मार्चला सोनगड येथून यात्रेचा समारोप होणार आहे. त्यानंतर राहुल गांधी १२ मार्चला थेट दिल्लीहून नंदुरबारकडे येतील.

दरम्यान, विमानाने सुरत व सुरतेहून वाहनाने नवापूरमार्गे नंदुरबार येथे दुपारी साडेबारापर्यंत येतील. नंदुरबार येथे भारत जोडो यात्रेला आदिवासी न्याय यात्रा या नावाने सुरुवात करणार आहेत. त्यानंतर ते दुपारी एकला यात्रा दोंडाईचाकडे रवाना होईल. दोंडाईचा, धुळे, नाशिक मार्गे यात्रा विविध जिल्ह्यांतून नेण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार पाडवी यांनी दिली. भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी.एम. संदीप, आमदार शिरीष नाईक, जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक आदी उपस्थित होते. काँग्रेस कार्यकाळात तत्कालीन पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशाशी निगडित योजनांची सुरुवात नंदुरबार येथून केली आहे. जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी गांधी घराण्यावर प्रेम केले आहे. त्याअनुषंगाने काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांची सुरू असलेली भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून भारत जोडो आदिवासी न्याय यात्रा म्हणून नंदुरबार येथून सुरू होणार असल्याची माहिती अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप यांनी दिली.