खुशखबर ! आता जळगावकर लगेच गाठणार मुंबई

जळगाव : भारत सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाच्या मान्यतेनुसार, उडान ५.० योजनेंतर्गत जळगाव विमानतळावरून पुणे, गोवा, हैदराबादसाठी सुरु झालेल्या विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता जळगाव ते मुंबई विमानसेवा सुरू करण्याच्या हालचाली अंतिम टप्प्यात आल्या आहेत. प्रायोगिक तत्त्वावर सुरुवातीला आठवड्यातून दोन दिवस जळगावहून मुंबईसाठी विमान उड्डाण घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.

मुंबई-जळगाव-मुंबई या विमानसेवेला 16 जूनपासून अधिकृतपणे सुरुवात होत आहे. ‘अलायन्स एअर’ या विमान कंपनीकडून सुरुवातीला आठवड्यातून दोन दिवस मुंबई- जळगाव ही विमानसेवा चालविण्यात येणार आहे. त्यानंतर प्रतिसाद पाहून सदरची विमानसेवा नियमित केली जाणार असल्याचे खात्रीदायक वृत्त आहे.

मुंबई ते जळगाव विमानसेवा सुरू झाल्यानंतर मंत्रालयीन कामानिमित्त तसेच इतर खासगी कामानिमित्त मुंबईचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची खूप मोठी सोय होऊ शकणार आहे. कारण, रेल्वेने मुंबई गाठण्यासाठी सध्याच्या घडीला किमान सहा तास तरी लागतात. त्यात गर्दीच्या हंगामात लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये बऱ्याचवेळा जागा मिळत नाही.

गोवा, हैदराबाद, पुणे आणि आता मुंबईची विमानसेवा सुरळीत झाल्यानंतर जळगाव येथून अहमदाबादसाठी देखील विमानसेवा प्रस्तावित आहे. केंद्र सरकारची ‘अलायन्स एअर’ कंपनी अहमदाबाद-जळगाव-अहमदाबाद दरम्यान विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या तयारीला देखील लागली आहे. त्यासंदर्भात अधिकृत तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे.