चेतन राजहंस यांचे आवाहन : सनातन धर्म नष्ट करण्याची भाषा करणाऱ्यांचे षङ्यंत्र हाणून पाडा

जळगाव : तामिळनाडूतील द्रवीड मुन्नेत्र कळघम या पक्षाचे नेते उदयनिधी स्टॅलीन यांनी सनातन धर्माविषयी द्वेषमूलक विधान केले. सनातन धर्माची तुलना संसर्गजन्य रोगाशी करून ते थांबले नाहीत, तर सनातन धर्म नष्टच करून टाकण्याची इच्छाही त्यांनी जाहीरपणे मांडली. सदर वक्तव्य हे हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावणारे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ‌‘हेट स्पीच’ होते. तरीही महाराष्ट्रातील पत्रकार निखिल वागळे यांनी ‌‘उदयनिधी स्टॅलिनच्या मताशी मी सहमत आहे. सनातन धर्म हा एखाद्या रोगासारखा आहे.,’ अशी पोस्ट फेसबूकद्वारे केली. हा एकप्रकारे सनातन धर्माचा अपमान आहे. त्यामुळे सनातन धर्म नष्ट करण्याची भाषा करणाऱ्यांचे षङ्यंत्र कायदेशी मार्गाने हिंदू बांधवांनी हाणून पाडावे, असे आवाहन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी केले.

हिंदू जनजागृती समितीच्या वतीने शहरातील पद्मालय विश्रामगृहात शुक्रवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  या परिषदेला सनातन संस्थेचे सद्गुरू नंदकुमार जाधव आणि हिंदू जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक प्रशांत जुवेकर यांनी संबोधित केले.धर्म नष्ट होऊ शकत नाही, हे सनातन सत्य आहे. धर्म नष्ट करण्याची भाषा करणाऱ्यांच्या मनामध्ये धार्मिक समूहाचा वंशविच्छेद हेच ध्येय आहे. यासाठी महाराष्ट्रातील सनातनधर्मी हिंदू समाजाने सजग होण्याची आणि लोकशाही मार्गाने या सनातन धर्मविरोधी वक्तव्यांचा प्रतिवाद करण्याची आवश्यकता असल्याचे चेतन राजहंस यांनी सांगितले.

सनातन धर्म कर्तव्यांशी संबंधित धर्म :  सद््‌‍गुरू नंदकुमार जाधव

सनातन धर्म हा पुजा परंपरेशी नाही, तर कर्म-कर्तव्यांशी संबंधित आहे. गृहस्थ व्यक्तीसाठी वृद्ध मातापित्याची सेवा आणि अपत्यांचा साभाळ हा गृहस्थ धर्म आहे. दुकानदारांसाठी ग्राहकहित, डॉक्टरसाठी रुग्णांचे स्वास्थ्य रक्षण हा धर्म आहे. हा धर्म शाश्वत आहे; कारण तो अमेरिकेत आणि जळगाव येथे एकच आहे आणि 100 वर्षांपूर्वी अन्‌‍‍ 100 वर्षांनंतरही हेच कर्तव्य कर्म कायम राहणार आहे. थोडक्यात सनातन धर्म स्थळ काळ बंधन नसलेला चिरंतन असल्याचे सनातन संस्थेचे सद्गुरू नंदकुमार जाधव यांनी सांगितले.

जल्ह्यात 5 तालुक्यांत तक्रारी दाखल करणार 

सनातन धर्म नष्ट करण्याची भाषा करणाऱ्यांच्या विरोधात सध्या समविचारी संघटनांच्या वतीने जागृतीपर सनातन धर्मरक्षण अभियान राबवण्यात येत आहे. या अंतर्गत जागृतीसोबत धर्मविरोधी शक्तींचा लोकशाही मार्गाने विरोधही केला जाणार आहे.  जळगाव जिल्ह्यात जळगावसह भुसावळ, चोपडा, यावल, रावेर या 5 तालुक्यांत सनातन धर्माच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्ये करणाऱ्यांच्या विरोधात तक्रारी दाखल करण्यात येणार हिंदू जनजागृती समितीचे  प्रशांत जुवेकर यांनी सांगितले.