जळगाव अग्नितांडवात एकाचा मृत्यू; २३ कामगारांना बाहेर काढण्यात यश, एक बेपत्ता

जळगाव : एमआयडीसीमधील (मौर्या ग्लोबल लि.) केमिकल कंपनीला आज बुधवारी सकाळी भीषण आग लागली. कंपनीत काम सुरु असताना ही दुर्घटना घडली असून आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. या कंपनीत २५ कामगार होते त्यापैकी २३ कामगारांना बाहेर काढण्यात यश आले असून, त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर समाधान पाटील यांचा मृत्यू झाला असून, रामदास घाणेकर हे बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीत एकूण २५ कामगार होते त्यापैकी २३ कामगारांना बाहेर काढण्यात आले. त्यापैकी सात जखमी कामगारांना प्रथम उपपचारासाठी सारा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील तिघांना जळगाव जिल्हा रुग्णालयात, एकाला ओम क्रिटीकल, एकाला ख़ुशी मल्टी स्पेशिलिस्ट रुग्णलयात तर दोघांना न्यू मंगल मूर्ती रुग्णालयात हलविण्यात आले आहेत.

जखमींची नावे अशी
कपिल पाटील, विशाल बारी, मयूर कंगार, फिरोज तडवी, सचिन चौधरी, भिकन खैरनार, किशोर चौधरी, गोपाल पाटील, चंद्रकांत पाटील, आनंद जाधव, रमेश पवार, नंदू पवार, चंद्रकांत गोजरे, गणेश सोनवणे, कपिल बाविस्कर, परब, अनिताबाई, नवाज तडवी, संतोष पाटील, उमेश कोळी, मंगल पाटील, करण, सिद्धू अशी जखमींची नावे आहेत.