जळगाव जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ; गुंगीचे औषध… एकाच रात्रीत इतके घर फोडली

जळगाव : जळगावसह यावल तालुक्यात दरोडा टाकून घरातील रोकड व सोने लंपास केल्याची घटना गुरुवार, ३० रोजी घडली. जळगाव शहरातील दूध फेडरेशन परिसरातून घरमालकासह दोन सुरक्षारक्षकांना गुंगीचे औषध टाकलेले सरबत पाजले. घरातील महिलेला धमकी देत घरातील मौल्यवान वस्तू व सोन्याचे दागिने चोरून नेले. तर, यावल तालुक्यातील किनगाव आणि साकळी या दोन गावांमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे दिड लाख रुपये किमतीची दागिने व रोख रक्कम घेऊन पसार झाले. याबाबत पोलीस ठाण्यात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील दूध फेडरेशन परिसरात राजा ट्रॅक्टरचे मालक राजेंद्र अनिल मयूर उर्फ राजा मयूर (८४) हे आपल्या पत्नीसह वास्तव्याला आहे. त्यांच्या बंगल्यावर विकास नेपाळी नावाचा माणूस कामाला होता. त्यांच्या घराच्या बाजूलाच्या खोलीत तो राहत होता. या बंगल्यात दोन सुरक्षारक्षक देखील रात्रीला पहारा देत असतात. गुरुवार, ३० मे रोजी रात्री १०.३० वाजता विकास नेपाळी याने भावाला मुलगा झाल्याचे सांगून सुरक्षारक्षक वसंत श्रीखंडे, उदय समेळ  व घर मालक राजा मयूर यांना सरबत पाजले.

या सरबतमध्ये त्याने गुंगीचे औषध टाकले होते. यामुळे दोनही सुरक्षारक्षक आणि राजा मयूर हे बेशुद्ध झाले. त्यांनतर विकास नेपाळी याने त्याचे साथीदार असलेल्या चार जणांना बोलावून घेतले. त्यावेळी घरात राजा मयूर यांची पत्नी शैला मयूर यांना बाथरूममध्ये बंद करून त्यांना धमकी दिली.

दरम्यान, आरोपी विकास नेपाळी व त्याचे इतर चार अज्ञात साथीदार यांनी मिळून घरातील मुख्य खोली उघडून घरातील सामान अस्ताव्यस्त करून घरातील मौल्यवान वस्तू व सोन्याचे दागिने असा मुद्देमाल चोरून नेला.

सकाळी ७ वाजता राजा मयूर हे जैन हिल्स येथे मॉर्निंग वॉकिंगसाठी जातात. त्यामुळे नेहमीप्रमाणे त्यांचा चालक कांतीलाल टाक यांनी राजा मयूर यांना फोन लावला, परंतु त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे चालकाने याने त्यांचे भाऊ भरत मयूर यांना फोन करून ते फोन उचलत नसल्याचे सांगितले. त्यानुसार भारत मयूर हे राजा मयूर यांच्या घरी आले असता, हा सर्व प्रकार उघडकीला आला. यावेळी बेशुद्ध अवस्थेत पडलेले सुरक्षारक्षक आणि राजा मयूर हे बेशुद्ध अवस्थेत होते. त्यांना उठवून पाणी पाजले. त्यानंतर भेदरलेल्या अवस्थेत असलेल्या शैला मयूर यांना देखील धीर दिला.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तसेच विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित व पथक घटनांसाठी दाखल झाले. शहर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून पुढील चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे.

दुसरी घटना यावल तालुक्यातील किनगाव आणि साकळी या दोन गावांमध्ये घडली. किनगाव येथील आत्माराम नगरमध्ये राहणारे रफीक वजीर तडवी यांच्या घरातुन दिनांक २९ मे रोजी रात्रीच्या सुमारास रफीक तडवी यांच्या घरातील मंडळीवर घराच्या छतावर झोपलेली असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करीत घरातील फर्नीचर ड्रॉवरमध्ये ठेवलेले सोन्या चांदीचे सुमारे १लाख दहा हजार रूपये किमतीचे दागीने व२ हजार रूपये रोख असा १ लाख२० हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेनेला.

दुसर्‍या ठिकाणी ३० मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कोळीळाबाई काशिनाथ पाटील राहणार लोधीवाडा साकळी येथे यांच्या घरातील मंडळी ही छतावर झोपलेली असतांना मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरड्यांनी घराच्या प्रवेशव्दारे चे कडी कोंडा तोडून घरात प्रवेश करून घरातील कपाटा मध्ये ठेवलेले २० हजार रूपये किमतीचे दागीने व१७ हजार रूपये रोख चोरून नेल्याची घटना घडली आहे.

याबाबत कोकिळाबाई काशिनाथ पाटील ( राहणार साकळी ) व रफीक वजीर तडवी ( राहणार किनगाव बु॥ ) यांनी यावल पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन ,पुढील तपास पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक सुनिल मोरे व सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोदकुमार गोसावी हे करीत आहेत.