जळगाव : रेल्वेच्या धक्क्याने अनोळखी तरूणाचा मृत्यू

जळगाव : धावत्या रेल्वे खाली आल्याने एका तरुणाचा मुत्यू झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील भादली गावादरम्यानच्या रेल्वेलाईनवर घडल्याची माहिती समोर आली आहे. मृत व्यक्तीची अद्यापही ओळख पटलेली नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद ते भादली दरम्यानच्या अपलाइन वरील रेल्वे खंबा क्रमांक ४२७ च्या ११ आणि १३ च्या दरम्यान एका अनोळखी अंदाजे ४० वर्षीय तरुणाचा धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार २२ मार्च रोजी रात्री ८ वाजता घडली आहे. ही घटना घडल्यानंतर नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह रवाना करण्यात आला. दरम्यान यासंदर्भात नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.