जाणून घ्या, जपान-यूकेमध्ये मंदीचा भारतावर कसा होणार परिणाम?

जपान आता जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था राहिलेली नाही. सलग दोन तिमाहीत जीडीपीच्या घसरणीमुळे जपानने तिसरे स्थान गमावले. यासोबतच जपानही मंदीच्या गर्तेत अडकला आहे. जपानसोबतच ब्रिटन आणि फिनलंडसह जगातील नऊ देश मंदीच्या गर्तेत अडकले आहेत.जपान, ब्रिटन, डेन्मार्क, एस्टोनिया, फिनलंड, लक्झेंबर्ग, मोल्दोव्हा, पेरू आणि आयर्लंड हे नऊ देश आर्थिक मंदीशी झुंजत आहेत. यापैकी सात देश युरोपातील आहेत. जपान हा आशियातील देश आणि दक्षिण अमेरिकेतील पेरू हा देश मंदीशी झुंजत आहे. आफ्रिका आणि उत्तर अमेरिकेतील कोणत्याही देशाचा समावेश नाही.

मंदीचा भारतावर काय परिणाम होईल?
मोठी अर्थव्यवस्था असलेल्या कोणत्याही देशात मंदी ही चिंतेची बाब असते कारण त्याचा परिणाम इतर देशांवर होतो. मात्र, जपान आणि ब्रिटनमधील मंदीचा प्रभाव भारतात कमी होण्याची शक्यता आहे. कारण भारताचा जीडीपी वाढीचा दर चांगला आहे. IMF च्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतीय अर्थव्यवस्था 4.112 ट्रिलियन डॉलरसह पाचव्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत भारत लवकरच जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो. यापूर्वी अनेक रेटिंग एजन्सींनीही भारताबाबत असे भाकीत केले होते.

भारतही मंदीचा बळी ठरू शकतो का?
जेव्हा दीर्घकाळ अर्थव्यवस्थेत सतत घसरण होत असते, तेव्हा तो देश मंदीचा बळी असतो असे म्हटले जाते. अर्थव्यवस्थेतील वाढ किंवा घसरणीची आकडेवारी जीडीपी विकास दरावरून दिसून येते. जेव्हा मंदी येते तेव्हा नोकऱ्या जातात, बेरोजगारी वाढते, शेअर बाजार घसरतो आणि पगार आणि भत्ते कमी होतात.भारतात सध्या तशी परिस्थिती नाही. भारताचा जीडीपी विकास दर वाढत आहे. 2030 पर्यंत भारत दरवर्षी सात टक्के विकास दराने प्रगती करू शकेल असा अंदाज आहे.