जास्तीचे उत्पादन, दर्जेदार पीक येईल, काकडीच्या बोगस बियाण्याची विक्री

नंदुरबार : जास्तीचे उत्पादन व दर्जेदार पीक येण्याची आमिष दाखवित सुरत येथील सागर बायोटेक प्रा. लि. कंपनीने बोगस बियाणे विक्री करून शेतकऱ्याची फसवणूक केल्याची घटना नंदुरबार तालुक्यातील चौपाळ येथे घडली. या बोगस बियाण्यांमुळे काकडीचे पीक निकृष्ट दर्जाचे आले असून अपेक्षेपेक्षाही कमी उत्पादन आले आहे. यासंदर्भात शेतकऱ्याने केलेल्या तक्रारीची दखल घेत नंदुरबार कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी बियाणे विक्रेत्याकडे भेट देऊन सागर बायोटेक प्रा.लि. कंपनीच्या बोगस बियाण्यांची चौकशी केली आहे. यासंदर्भात कृषी विभागाने नोंदविलेल्या पंचनाम्यात काकडीचे बियाणे जाहिरातीत दिलेल्या रंगानुसार वेगळ्याच रंगाच्या आल्याचे नमूद करीत सदोष बियाणे असल्याचा पंचनामा तयार करून  शेतकऱ्याची फसवणूक झाल्याची अहवालात नमूद केले आहे. बोगस बियाणे विक्री करणाऱ्या सागर बायोटेक प्रा. लि. कंपनीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.
नंदुरबार तालुक्यातील चौपाळे येथील हिम्मतराव गंगाराम माळी हे बागायतदार शेतकरी आहेत. गेल्या काही वर्षांपासून माळी हे सागर बायोटेक प्रा. लि.  कंपनीची बियाणे खरेदी करून उत्पादन घेतात. यावर्षी देखील हिम्मतराव माळी यांनी काकडी पिकाची लागवड करण्यासाठी नंदुरबार येथील न्यू विलास ऍग्रो ट्रेडर्स या खत विक्रेत्याकडून काकडी फळाच्या काकडी श्रावणी हे सागर कंपनीचे बियाणे खरेदी केले. या बियाण्याच्या संदर्भात काकडीचे फळ दर्जेदार व उत्पादन वाढी संदर्भातील जाहिरात करण्यात आली. त्यावर विश्वास ठेवून शेतकरी हिम्मतराव माळी यांनी सुरत येथील सागर बायोटेक प्रा. लि. कंपनीचे काकडीचे बियाणे खरेदी करून शेतात लागवड केली. परंतु आलेल्या उत्पादनात काकडीचा वेगळाच रंग आला असून चव देखील हलक्या स्वरूपाची आली आहे. तसेच शेतकऱ्याला अपेक्षित असलेले काकडीचे उत्पादन देखील कमी आले आहे.
त्यामुळे शेतकऱ्याला उत्पादनात मोठा फटका बसला असून सागर बायोटेक प्रा.  लि. कंपनीने बियाण्या संदर्भात नमूद केल्याप्रमाणे काकडीचे उत्पादन आलेले नाही. म्हणून कंपनीकडून दिशाभूल करीत शेतकऱ्यास बोगस बियाणे विक्री करण्यात आल्याचे लक्षात आले. सदर बियाणे सागर कंपनीचे नसून हे बियाणे बोगस कंपनीचे असल्याने शेतकऱ्याची फसवणूक झाली आहे. शेतकऱ्यांनी ज्या विक्रेत्याकडून हे बियाणे खरेदी केले त्या विक्रेत्याकडे तक्रार केली असता न्यू विलास ऍग्रो ट्रेडर्स या विक्रेत्याने शेतकऱ्यांशी अरेरावीची भाषा केली. या बोगस बियाणे विक्रीबाबत शेतकरी हिम्मतराव माळी यांनी नंदुरबार तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी न्यू विलास ऍग्रो ट्रेडर्स येथे जाऊन काकडी श्रावणी या सागर बायोटेक प्रा.लि.  कंपनीच्या बियाण्याची चौकशी केली. या चौकशीत बियाणे संदर्भात दिलेल्या माहितीनुसार पीक न येता काकडी वाणाच्या रंगांमध्ये वेगळाच बदल दिसून आला. म्हणून कृषी विभागाच्या अधिकारी समितीने शेतकऱ्याच्या शेतात जाऊन भेट दिली असून केलेल्या चौकशीनुसार सागर बायोटेक प्रा. लि.  कंपनीचे काकडीची बियाणे बोगस म्हणजे सदोष बियाणे असल्याचे तक्रार निवारण समिती क्षेत्रभेटीचा अहवाल व पंचनाम्यात नमूद केले आहे.
यावेळी नंदुरबारची उपविभागीय कृषी अधिकारी एन. बी. भागेश्वर, तालुका कृषी अधिकारी एस.ए.शेळके, धुळे कृषी महाविद्यालयाचे विस्तार कृषी विद्यावेत्ता प्रा. श्रीधर देसले, पंचायत समितीचे कृषी अधिकारी वाय.एस.हिवराळे यांच्या समितीने प्रक्षेत्रात भेट देऊन लागवड केलेल्या काकडी पिकाची पाहणी केली असता त्याच बोगस बियाणे आढळून आले आहे. शेतकऱ्याने मागणी केल्यानुसार काकडीचे पीक व्हाईट क्रेमी येणे अपेक्षित असताना त्याऐवजी बोगस बियाण्यांमुळे काकडीचा रंग गर्द हिरवा आला असून प्रक्षेत्रिय भेटीदरम्यान कृषी तालुका तक्रार निवारण समितीच्या अधिकाऱ्यांसोबत आलेल्या सागर बायोटेक प्रा. लि. कंपनीच्या प्रतिनिधीने पाहणी केल्यानुसार काकडीचा रंग हिरवा गर्द असल्याचे मान्य केले आहे. म्हणून पाहणी व चौकशीनुसार बोगस बियाण्यांची विक्री झाल्याचे निदर्शनास आले आहे. बियाणे विक्रेता व सागर बायोटेक प्रा. लि.  कंपनीने शेतकरी हिम्मतराव माळी यांची फसवणूक केली असल्याचा प्रथमदर्शनी पंचनामा तक्रार निवारण समितीच्या सदस्यांनी प्रक्षेत्रास दिलेल्या भेटीनुसार नोंदविला आहे. शेतकऱ्याची फसवणूक झाल्याची अहवालात नमूद केले आहे. खोटी व दिशाभूल करणारी आश्वासने देऊन शेतकऱ्यांना बोगस बियाणे विक्री करणाऱ्या सागर बायोटेक प्रा.  लि. कंपनीसह बियाणे विक्रेत्यावर कठोर कारवाई करून झालेली नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकरी हिम्मतराव गंगाराम माळी यांनी केलेल्या तक्रारीतून केली आहे.