जुन्या वादातून तरुणाला आयुष्यातून उठवलं; चार संशयितांना अटक

जळगाव : जुन्या वादातून सात जणांनी किशोर अशोक सोनवणे या तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून केला. जळगाव शहरातील कालिंका माता मंदिर परिसरातील हॉटेल भानू येथे बुधवारी रात्री ही घटना घडली. या प्रकरणी ११ जणांवर गुन्हा दाखल झाला असून, चार संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.

किशोरच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, किशोरचा बुधवारी सायंकाळी कालिंका माता मंदिर परिसरात एका चायनीज विक्रेत्यासोबत वाद झाला होता. त्यानंतर तो रात्री कालिंका माता मंदिर परिसरातील हॉटेल भानू येथे जेवणासाठी गेला होता. रात्री ९.३० वाजेच्या सुमारास हॉटेलमध्ये काही तरुणांनी त्याच्याशी जुन्या वादातून बराचवेळ वाद घातला. काही वेळानंतर वाद शांत झाला. त्यानंतर पुन्हा वाद उकरून काही तरुणांनी किशोरवर हल्ला चढवला. लाकडी दांड्याने मारहाण व धारदार शस्त्राने सात ते आठ वार झाल्यामुळे किशोर रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर शनिपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह जीएमसीत हलवण्यात आला. दरम्यान, वादाचा सर्व प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्यावरून पोलिसांनी चार संशयितास ताब्यात घेतले आहे. प्रशांत सुभाष काकडे (30 ), रुपेश सुभाष काकडे (27),  ईश्वर सुभाष काकडे (23 ),  मयूर विनोद कोळी (वय  21 सर्व राहणार असोदा रोड मोहन टॉकीज जवळ जळगाव यांना अटक करण्यात आली आहे.