जेजूरी गड हे समाज जागृतीचे श्रद्धा केंद्र, यामुळेच धर्म टिकला : डॅा. मोहनजी भागवत

पुणे  :  “देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांचे दैवत म्हणजे खंडोबा. जेजूरी गडावर आल्यामुळे आज खऱ्या अर्थाने माझे देवदर्शन झाले आहे. जेजूरी गड हे समाज जागृतीचे श्रद्धा केंद्र असून यामुळेच धर्म टिकला आहे.”, असे गौरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॅा. मोहनजी भागवत यांनी काढले. गुरूवार, दि. ५ सप्टेंबर रोजी जेजूरी येथील श्री. मार्तंड देव संस्थानाला भेट देत सरसंघचालकांनी श्री खंडोबाचे दर्शन घेतले. यावेळी श्री मार्तंड देव संस्थानचे अध्यक्ष – प्रमूख विश्वस्त अनिल सौंदडे, विश्वस्त अभिजित देवकाते, विश्वस्त राजेंद्र खेडेकर, विश्वस्त मंगेश घोणे, विश्वस्त ॲड. विश्वास पानसे, विश्वस्त ॲड. पांडुरंग थोरवे, विश्वस्त पोपट खोमणे, पदसिद्ध विश्वस्त तथा तहसिलदार विक्रम राजपूत, व्यवस्थापक आशिष बाठे उपस्थित होते.

यावेळी देव संस्थान आणि जेजूरी ग्रामस्थांच्या वतीने सरसंघचालकांना मानपत्र प्रदान करण्यात आले. मानपत्राचे वाचन पोपट खोमणे यांनी केले. सरसंघचालकांनी यावेळी देवाचा तळी भंडारा केला. दरम्यान देवाच्या खंडा तलवारीची कसरत त्यांनी पाहिली. गडावर येत्या काळात नवीन भक्तनिवास उभारण्यात येणार असून, गुरूकुल पद्धतीचे शिक्षणही उपलब्ध करण्यात येणार आहे असल्याची माहिती प्रमूख विश्वस्त सौंदडे यांनी यावेळी दिली.

समरसतेच्या कार्यासाठी मानपत्र
देव, देश, धर्म टिकावा म्हणून मंदिर, पाणी आणि स्मशान या विषयांवर समरसतेचे वातावरण तयार करण्यासाठी देशभर अग्रेसर म्हणून सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत कार्य करत आहेत. म्हणून हे मानपत्र प्रदान करण्यात आल्याचे म्हटले आहे. ज्यांनी वर खेचायचे आहे त्यांनी थोडे वाकले पाहिजे, ज्यांना वर यायचे आहे, त्यांनी थोड्या टाचा उंच केल्या पाहिजेत. त्याच वेळेस समता आणि समरसता प्रस्तापित होईल, या सरसंघचालकांच्या विधानाचाही मानपत्रात स्थान देण्यात आले आहे. श्री खंडेरायाची पगडी, घोंगडे आणि भारतमातेच्या प्रतिमेने संरसंघचालकांचे स्वागत करण्यात आले.

द्वादश मल्हार दर्शन सृष्टीचे भूमिपूजन
महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील खंडोबा देवाची प्रमूख १२ ठाणी आहेत. याचे दर्शन जेजूरीत येणाऱ्या भाविकांना एकाच ठिकाणी व्हावे, या उद्देशाने देव संस्थान आणि पूरातत्व विभागाच्या वतीने द्वादश मल्हार दर्शन सृष्टी उभारण्याचे कार्य होणार आहे. त्याचे भूमिपूजन आणि कोनशिलेचे उद्घाटन सरसंघचालकांच्या हस्ते झाले.