तुमच्या डोक्यात केमिकल लोचा झालाय, प्रकाश आंबेडकरांचा नाना पटोलेंवर हल्ला

मुंबई: लोकसभेच्या जागावाटपावरून मविआने दिलेल्या आमंत्रणावरून वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाची चर्चा 25 जानेवारी रोजी होणार होती. त्या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीलाही निमंत्रण देण्यात आलं आहे. तशा आशयाचं महाविकास आघाडीकडून एक पत्रक जारी करण्यात आलं असून त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या नावाच्या सह्या आहेत. त्यावर प्रकाश आंबेडकरांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

नाना पटोले यांना इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीसंबंधी निर्णय प्रक्रियेमध्ये कोणतेही अधिकार नसताना त्यांच्या सहीने वंचितला बैठकीसाठी कसे काय आमंत्रण दिलं गेलं असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी विचारला आहे.नाना पटोले हे महाराष्ट्राच्या जनतेसोबत माईंड गेम खेळतात किंवा त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी लोचा झाल्याची टीका त्यांनी केली.