दक्षिण भारतात देखील भाजप मजबूत ; मोदींनी व्यक्त केला विश्वास

भुवनेश्वर : दक्षिण भारतातील राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या अस्तित्वाबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रश्नाचे उत्तर पंतप्रधान मोदींनी एका मुलाखतीत दिले. ते म्हणाले की, ‘भाजप दक्षिण भारतातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल आणि 4 जून रोजी निवडणूक निकाल जाहीर होतील तेव्हा एनडीए लोकसभेच्या 400 हून अधिक जागा जिंकेल.’ पीएम मोदी म्हणाले की, ‘विरोधकांनी असा समज निर्माण केला आहे की दक्षिणेकडील राज्यांमध्ये भाजपची ताकद नाही किंवा तेथे त्यांचे अस्तित्व नाही.’ ते म्हणाले, 2019 च्या निवडणुका बघा. तेव्हाही दक्षिण भारतातील सर्वात मोठा पक्ष भाजपच होता. पुन्हा एकदा मी सांगतो, यावेळी दक्षिणेतील सर्वात मोठा पक्ष भाजप असेल आणि त्यांच्या मित्रपक्षांना जास्त जागा मिळतील.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, ‘आम्ही दक्षिण भारतातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येऊ आणि गेल्या वेळेपेक्षा जास्त फरकाने जिंकू. लोकांच्या विचारसरणीत बदल झालेला आपण पाहिला आहे. आम्ही आमच्या जागांच्या संख्येत आणि मतदानाच्या टक्केवारीतही मोठी वाढ पाहणार आहोत, लोकसभेच्या 543 जागांपैकी दक्षिण भारतात 131 जागा आहेत. भाजपकडे कर्नाटकातून २९ सदस्य आहेत. याशिवाय एका अपक्ष सदस्याचाही पाठिंबा आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘पूर्व भारतातही आम्हाला लोकांचा मोठा पाठिंबा दिसत आहे, त्यामुळे भुवनेश्वर, कोलकाता आणि दिल्लीतील मीडिया आणि राजकारणातील काही लोकांची रात्रीची झोप उडाली आहे.’ या निवडणुकांमध्ये तथाकथित ‘रेड कॉरिडॉर’ ‘भगवा कॉरिडॉर’ होईल, असे ते म्हणाले. निवडणुकीच्या मागील टप्प्यांचे सर्व मूल्यांकन दर्शविते की एनडीए मजबूत स्थितीत आहे तर काँग्रेस तसेच त्यांची ‘इंडिया’ आघाडी काही राज्यांमध्ये आपले खाते उघडण्यासाठी धडपडत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘आम्ही 400 पार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. निवडणुकीच्या चार टप्प्यांनंतर मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की आमचे मूल्यांकन योग्य आहे आणि जनता जनार्दनचा संकल्प आमच्या मूल्यांकनापेक्षा अधिक मजबूत आहे. ते म्हणाले की, ‘एक समज पसरवली गेली आहे. वर्षानुवर्षे आपल्या देशात अशी व्यवस्था आहे जी देशाची दिशाभूल करण्यासाठी आणि बरबाद करण्यासाठी सर्व प्रकारचे मिथक निर्माण करते. ते हे मुद्दाम करतात आणि असा एक समज पसरवला गेला आहे की दक्षिण भारतात आपले अस्तित्व नाही.