दिवाळीची सुट्टी! फिरायला गेले, मात्र काळाने घात केला; जळगाव जिल्ह्यात हळहळ

जळगाव : जिल्ह्यातील शिक्षकांचे दोन कुटुंब राजस्थानमधील जैसलमेर येथे फिरायला गेले होते. मात्र, तेथे काळाने घात केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कंटेनरच्या धडकेत गाडीतील पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घडलीय. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील शिक्षक धनराज नागराज सोनवणे (५५) रा. बेटावद व योगेश धोंडू साळुंखे रा. पिंपळे रोड अमळनेर या दोन्ही शिक्षकांचे कुटुंब गाडी क्र एम.एच०४. ९११४ ने राजस्थान येथे फिरायला जात होते.

दरम्यान, आज १३ रोजी दुपारी पावणे तीन वाजता बारमेर रस्त्यावर डोरीमना गावाजवळ एका कंटेनरने धडक दिल्याने धनराज सोनवणे, त्यांची मुलगी (नाव माहीत नाही), गायत्री योगेश साळुंखे (३०), प्रशांत योगेश साळुंखे (७), भाग्यलक्ष्मी साळुंखे (१) यांचा जागीच मृत्यू झाला.

धनराज सोनवणे यांच्या पत्नी गंभीर जखमी आहेत. मंत्री अनिल पाटील व माजी आमदार शिरीष चौधरी यांनी मदतीसाठी तातडीने हालचाली करून तेथील जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांशी बोलणे केल्याची माहिती समोर आली आहे.