दुर्दैवी ! मुसळधार पावसाने बोगद्यात साचले पाणी; बैलगाडीने शेताकडे निघालेल्या शेतकऱ्याचा बुडून मृत्यू

जळगाव : जळगाव शहरात मंगळवारी मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला. यामुळे आसोदा ते मन्यारखेडा रस्त्यावरील रेल्वे बोगद्यात पाणी साचले आहे. या पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात गेलेल्या बैलगाडीला जुंपलेल्या बैलाची सुटका करताना एका शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आज मंगळवार, ११ रोजी सकाळी १० वाजता घडली. सुकलाल लालचंद माळी (६३ रा. आसोदा ता. जळगाव) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

जळगाव तालुक्यातील आसोदा गावात सुकलाल लालचंद माळी हे आपल्या पत्नी, मुलगा आणि सुन यांच्यासोबत वास्तव्याला होते. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. सुकलाल माळी हे आज मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास बैलगाडीने मन्यारखेडा रस्त्यावरील शेतात जाण्यासाठी निघाले होते.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात मंगळवार, ११ रोजी मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला. यामुळे आसोदा ते मन्यारखेडा रस्त्यावरील रेल्वे बोगद्यात पाणी साचलेले होते. या पाण्याचा अंदाज न आल्याने सुकलाल माळी यांनी बैलगाडी बोगद्याखालून जाण्यासाठी टाकली. अशातच सुकलाल माळी हे बैलगाडीसह पाण्यात बुडाले. यावेळी त्यांनी दोन्ही बैलांची सुटका करण्यासाठी बैलगाडीची जोत ताडली.

तेव्हढयात भेदलेल्या बैलांनी झटका देवून बाहेर आले. पर्णातू, सुकलाल माळी यांना पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून दुदैवी मृत्यू झाला. ही घटना शेजारी शेतात काम करणाऱ्या शेतमजूरांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने धाव घेतली.  त्यांना खासगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तपासणी अंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी चमेलीबाई, मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे. या घटनेमुळे आसोदा गावात हळहळ व्यक्त होत आहे.