कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना आवाहन ; खते,बि-बियाणे वाजवी दरात न मिळाल्यास लावा फोन! तक्रार निवारण कक्ष सुरू

जळगाव : खरीप हंगाम २०२४ अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणे, खत पुरवठा, उपलब्धता, वाजवी दरात विक्रीच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांतर्फे देण्यात आल्या आहेत. तरीही अधिक दरात विक्री होत असेल, तर शेतकऱ्यांनी तक्रार निवारण कक्षात फोन लावावा, असे अवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते तक्रार निवारण कक्ष व टोल फ्री क्रमांकाचा प्रारंभ करण्यात आला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, कृषी विकास अधिकारी सूरज जगताप, मोहीम अधिकारी विजय पवार व कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी या वेळी उपस्थित होते.

टोल फ्री ७४९८१९२२२१ या क्रमांकावर, तसेच कृषी विभागाच्या ०२५७-२२३९०५४ व ९८३४६८४६२० यापैकी कोणत्याही दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा. बियाणे किंवा खते उपलब्ध होत नसल्यास, याबाबत कुठलीही तक्रार असल्यास वरील क्रमांकांवर कॉल करावा.

त्या ठिकाणी कंट्रोल रुम तथा नियंत्रण कक्षातून आपणास मार्गदर्शन मिळेल व आपल्या समस्येबाबत संबंधित तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी व पंचायत समितीचे कृषी अधिकाऱ्यांना सूचना करण्यात येतील, असे कृषी विकास अधिकारी सूरज जगताप यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.