भाकरी खायची भारताची अन् चाकरी करायची पाकिस्तानची, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

xr:d:DAFe8DR0y38:2481,j:4440973134849772015,t:24040509

मुंबई : निवडणूक आल्यावर काँग्रेस नेते पाकिस्तानची भाषा बोलू लागले आहेत. ‘काँग्रेसचा हाथ पाकिस्तान के साथ’, हे सिद्ध झाले आहे. भाकरी खायची भारताची अन् चाकरी करायची पाकिस्तानची, अशा देशद्रोही काँग्रेसला निवडणुकीत हद्दपार करा, असा हल्लाबोल मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार डॉ. हीना गावीत यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. पूर्वी काँग्रेसचा प्रचार नंदुरबारमधून सुरू व्हायचा.

पण, त्यांनी इथल्या आदिवासींना मतांपुरते वापरले. त्यामुळे नंदुरबारची जनता याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी नंदुरबारमध्ये आले आहेत. त्यामुळे ४ जूनला डॉक्टर हिना गावित यांच्या विजयाची शुभ वार्ता पक्की झाली आहे. नंदुरबारमधील जनतेने जल, जंगल आणि जमीन सुरक्षित ठेवली आहे. आदिवासी समाजाच्या उत्थान, गौरव आणि सन्मानासाठी पंतप्रधानांनी आयुष्य समर्पित केले आहे. काँग्रेसने आदिवासींच्या जमिनीचा कुठलाही प्रश्न सोडवला नाही.

पंतप्रधान करून आदिवासींना त्यांचा हक्क मिळवून दिला. काँग्रेसच्या ६० वर्षांच्या काळात जे झाले नाही ते मागील १० वर्षांत पूर्ण झाले. पंतप्रधान आवास योजनेतून आदिवासींना हक्काची घरे मिळाली, ग्रामीण भागातील माता-भगिनींना घरात शौचालय मिळाले. देशातील ८० कोटी गरिबांना मोफत रेशन मिळाले. देशाच्या सर्वोच्च पदावर राष्ट्रपती म्हणून आदिवासी समाजाच्या महिला आपल्या भगिनी द्रौपदी मुर्मू यांना संधी देण्यात आली. सरकारने आदिवासी आश्रम शाळा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली. दोन लाखापेक्षा जास्त वन हक्क दावे मान्य केले, असे शिंदे यांनी सांगितले