भीषण! भरधाव कारने दिलेल्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; एका महिलेचा मृत्यू, चार जण गंभीर

जळगाव । जळगावमधून गेलेल्या महामार्गावर अपघाताचे होणारे प्रमाण काही कमी होत नाहीय. अशातच आणखी एक भीषण अपघात झाला. नशिराबाद गावाजवळील मुंजोबा मंदिराजवळील उड्डाणपुलावर कलर घेवून जात असलेल्या रिक्षाला मागून भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने धडक दिली. यात रिक्षामधील प्रवाशी महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. आस्माबी शेख मंजूर (वय ३०, रा. बोरखेडी ता. मोताळा, जि. बुलढाणा) असं मृत महिलेचं नाव असून त्यांच्यासोबत असलेले चार प्रवासी गंभीर जखमी झाले.

याबाबत असं की, जळगावकडून (एमएच १९ बीयू ५८४३ ) क्रमांकाच्या प्रवासी रिक्षातून प्रवासी कलर घेवून बुधवारी सायंकाळच्या सुमारास भुसावळकडे जात होते. याचवेळी मागून भरधाव वेगाने जाणाऱ्या (एमएच १९ इए ५१०९) क्रमांकाच्या कारने रिक्षाला मागून जोरदार धडक दिली. ही घटना नशिराबाद गावाजवळील मुंजोबा मंदिराजवळील उड्डाणपुलावर घडली.

कारने दिलेली धडक इतकी जोरात होती की, रिक्षा उलटून रिक्षातील प्रवासी महिला आस्माबी शेख मंजूर यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना लागलीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर त्यांच्यासोबत असलेली इतर चौघे प्रवासी गंभीर जखमी झाले होते. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांसह नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्र्वर मोताळे, सहाय्यक फौजदार हरिष पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले.