मुंबई ते दानापूर, गोरखपूरसाठी आठ विशेष एसी रेल्वे गाड्या धावणार !

भुसावळ : रेल्वे गाड्यांना उन्हाळ्याच्या सुटीमुळे होत असलेली गर्दी पाहता मध्य रेल्वेतर्फे मुंबई ते दानापूर, गोरखपूर दरम्यान आठ पूर्ण वातानुकूलित उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई ते उत्तरेकडे अधिक गाड्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी आणि उन्हाळी हंगामात आरामदायी प्रवास देण्यासाठी मध्य रेल्वेचे प्रयत्न आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-दानापूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वातानुकूलित विशेष रेल्वे गाडीच्या चार फेऱ्या होतील. यात ०११०७ वातानुकूलित विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून मंगळवार, ३० एप्रिल आणि शनिवार, ४ मे रोजी रात्री ११.२० वाजता सुटेल आणि दानापूर येथे तिसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता पोहोचेल. या गाडीच्या दोन फेऱ्या होतील. ०११०८ वातानुकूलीत विशेष गाडी दानापूर येथून गुरुवार, २ मे आणि सोमवार, ६ मे या दिवशी दुपारी एक वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता पोहोचणार आहे.

या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडीत दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा येथे थांबेल.मुंबई-दानापूर विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- गोरखपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वातानुकूलित विशेष रेल्वे गाडीच्या चार फेऱ्या होतील. यात ०११०९ वातानुकूलित विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून २ मे रोजी रात्री ११.५० वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे तिसऱ्या दिवशी सकाळी ८.२० वाजता पोहोचेल.