मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार: राज ठाकरेंनी केले जाहीर

मुंबई : आपल्या ओघवत्या शैलीसाठी ख्यात असणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मुंबईतील महायुतीच्या सभेत नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार असल्याचे जाहीरच करून टाकले.महायुतीच्या मुंबईतील उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत पंतप्रधान मोदींसह राज ठाकरे यांचे भाषणही सर्वांसाठी उत्सुकतेचा विषय असल्याने साऱ्यांचेच त्याकडे लक्ष होते. राज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात नेहरूंच्या नावाने केली.

ते म्हणाले की, जवाहरलाल नेहरू तीन वेळा देशाचे पंतप्रधान झाले होते. आता तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणारे नरेंद्र मोदी यांचे मी स्वागत करतो. सोबतच राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींच्या दहा वर्षांतील कामांचे कौतुक केले. मोदीजी, तुम्ही होतात म्हणून अयोध्येत राममंदिर उभे राहिले.

काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७०कलम तुमच्यामुळेच हटवले गेले.काश्मीर भारताचा भाग आहे, हे ३७० कलम घटनेनंतर भारतीयांना पहिल्यांदा वाटू लागले. मोदींनी याच पीडित मुस्लिम महिलांना ट्रीपल तलाकमधून बाहेर काढले, त्यांच्यावर जो अन्याय होतो, तो कायमचा दूर झाला. त्याबद्दल तुमचे अभिनंदन, असेही मनसे प्रमुख म्हणाले