राज्यात जनसहभागातून स्वच्छतेचा जागर

जळगाव : स्वच्छ भारत दिवस 2023 च्या निमित्ताने 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत स्वच्छता ही सेवा थीम “कचरामुक्त भारत” उपक्रम आयोजन करण्यात आले आहे. पंधरवडयानिमित्त पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत  राज्यात विविध उपक्रम राबविण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता राज्यातील प्रत्येक गावात महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार राज्यात सुमारे 56,786 उपक्रमांचे ग्रामीण भागात नियोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने महाश्रमदानाकरिता सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आवाहन केले आहे.

या पंधरवड्यानिमित्त दैनंदिन स्वच्छता विषयावर उपक्रम राबविण्याबाबत जिल्ह्यांनी नियोजन केले आहे. त्या अनुषंगाने राज्यात सद्य:स्थितीत 19,461 उपक्रम राबविण्यात आले. सुमारे 95,84,680 नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे राज्यात स्वच्छतेचे जनआंदोलन उभारले आहे.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने राज्याच्या प्रशासनाबरोबर ग्रामपंचायती व नागरिकांचा सहभाग मोलाचा आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाण, शासकीय इमारत, धार्मिक स्थळे, रेल्वेस्थानक, बसस्थानके, खुल्या जागा साफसफाई, कचरा संकलन व वर्गीकरण, ग्रामस्थांच्या सहभागाने नदी, समुद्र किनारे, नाले काठावरील व तळ्यातील प्लॅस्टिक कचरा गोळा करणेबाबत मोहीम राबवावयाची आहे.

या स्वच्छता मोहिमेत राज्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी,  जिल्हा परिषद, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, महिला बचत गट सदस्य, शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, स्वंयसेवी संस्था, युव ग्रुप, ग्रामस्थ यांनी मोठ्या प्रमाणावर सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.