राज्यात पुढचे दोन दिवस महत्वाचे ; ‘या’ जिल्ह्यात कोसळणार पाऊस?

जळगाव । जळगाव जिल्ह्यासह राज्यातील काही भागात गारपीट अन् अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अवकाळीचं हे संकट पुढील काही दिवस कायम राहील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, आज म्हणजेच मंगळवारी (२७ फेब्रुवारी) आणि बुधवारी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

याचदरम्यान काही भागात गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आलाय.दरम्यान, सोमवारी विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील काही भागात गारपिट आणि वादळी पावसाने हजेरी लावली. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तसेच अमळनेर तालुक्यात अनेक गावांमध्ये गारपीट झाली. पारोळा तालुक्यात भिलाली गाव तसेच इतर गावांमध्ये तब्बल वीस ते पंचवीस मिनिटं गारपीट झाल्याची माहिती आहे. तर काही तालुक्यांमध्ये वादळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे गव्हासह रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

आज आणि उद्या कुठे कोसळणार पाऊस?
आयएमडीने जारी केलेल्या अंदाजनुसार, मंगळवार २७ आणि बुधवार २८ फेब्रुवारी रोजी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील. छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे. याशिवाय विदर्भातील बुलढाणा , अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे.