राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर शिंगाडा मोर्चा

जळगाव : शेतकऱ्यांना पिक विम्याची सरसकट रक्कम द्या. जिल्ह्यात रावेर, यावल, रावेर, मुक्ताईगर, चोपडा तालुक्यात केळी पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. केळीची विमा रक्कम हवामानावर आधारीत मिळावी या मागण्यांसाठी शेतकऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी शिंगाडा मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादी कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

राष्ट्रवादी किसान सभेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील फळ पिक विमा प्राप्त केळी उत्पादक पात्र शेतकऱ्यांना मंजूर विम्याची रक्कम सरसकट मिळावी. पंतप्रधान फसल पीक विमा योजनेच्या अनुषंगाने हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना शासन निर्णयातील मुद्दा आठमधील अनु.क्र.9 नुसार योजनेचा लाभ कधीपर्यंत द्यावा, हे नमुद करण्यात आले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना केळी पिकाचा विमा अनुदान प्राप्त झाल्यानंतर तीन आठवड्यात पात्र शेतकऱ्यांना वितरित करणे आवश्यक आहे. सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यात विमा रक्कम  शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याबाबत अग्रिकल्चरल इन्सुरन्स ऑफ इंडियाचे व्यवस्थापक यांना लेखी सूचना जिल्हा कृषी अधिक्षक यांनी दिली होती. तसेच याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील, ना.अनिल पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या. त्यात विमा कंपनीने मंत्री, खासदार यांना विविध कारणे सांगून शेतकऱ्यांना संभ्रमात टाकले. सरसकट सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर मंजूर केळी पिक विमा रक्कम सरकार व विमा कंपनीने जमा करणे क्रमप्राप्त आहे. यासंदर्भात शासनाने दखल घेऊन केळी पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना तातडीने देण्यासाठी पाऊले उचलण्याची मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.