वाढत्या तापमाना मुळे जळगावकर त्रस्त; पारा ३६ अंशांच्या पुढे

तरुण भारत लाईव्ह । ५ ऑक्टोबर २०२३। यावर्षी मान्सून लवकर माघारी फिरल्याने जळगाव  जिल्ह्यात परतीचा आतापर्यंत केवळ २० टक्के पाऊस होऊ शकला. पाऊस नसल्याने हवामान आता बहुतांश कोरडे झाल्यामुळे तापमानाचा पारा वाढला आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून पारा ३४ ते ३६ अंशापर्यंत कायम असल्याने जळगावकरांना ऑक्टोबर हिट ने चांगले ग्रासल्याचे दिसत आहे.

बुधवारी जळगाव शहराचा पारा ३६ अंशापर्यंत गेला होता. कोरड्या व उष्ण हवेचे प्रमाण वाढले असून बाष्पोत्सर्जन वाढल्यामुळे असह्य उकाडा  जाणवत आहे. आगामी काही दिवसांमध्ये तापमानात वाढ होऊन ३७ अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे. तसेच हवामान देखील कोरडे राहणार असल्याने नवरात्र उत्सवापर्यंत जळगावकरांना ऑक्टोबर हिटचा सामना करावा लागणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

मान्सून आता जवळपास परतला असून अधिकृतरित्या दहा ऑक्टोबर नंतर राज्यातून मान्सून परतणार आहे. सध्या वातावरणात उष्णता वाढल्यामुळे बंगालच्या उपसागरात आगामी काही आठवड्यांमध्ये कमी दाबाचे क्षेत्र विकसित होऊ शकते. हे क्षेत्र जर तीव्र स्वरूपाचे झाल्यास त्यामुळे चक्रीवादळाची स्थिती निर्माण होऊन जिल्ह्यात ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात पावसाची स्थिती निर्माण होऊ शकते. मात्र जर क्षेत्र कमी तीव्र राहिली तर पावसाची स्थिती निर्माण होऊ शकत नाही. मात्र त्यामुळे उत्तरेकडून येणारे थंड वारे ऑक्टोबर अखेर पर्यंत महाराष्ट्र कडे येऊन गुलाबी थंडीचे आगमन होऊ शकते. सध्या तरी आठवडाभर तरी जळगावकरांना तीव्र उकडाचा सामना करावा लागणार आहे.