“विरोधकांना वक्फशी देणंघेणं नाही तर…”; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

पुणे : विरोधकांना वक्फशी देणंघेणं नाही तर त्यांना केवळ वक्फच्या जमिनी लाटायच्या आहेत, असा घणाघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. वक्फ बोर्डाच्या मनमानीला चाप लावण्यासाठी गुरूवारी संसदेत ‘वक्फ’ सुधारणा विधेयक मांडण्यात आले. मात्र, विरोधकांकडून या विधेयकाला विरोध करण्यात येत आहे. दरम्यान, आता फडणवीसांनी विरोधकांची पोलखोल केली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मागच्या काळात महाराष्ट्रात वक्फचा घोटाळा झाला. यावेळी वक्फच्या जमिनी कोणी लाटल्या, त्यात काँग्रेसचे कोणते नेते होते, हे सगळ्यांनी पाहिलं आहे. त्याचा अहवालही समोर आला आहे. विरोधकांना वक्फशी काहीही देणंघेणं नाही. तर त्यांना त्या जमिनीशी देणंघेणं आहे. त्या जमिनी कशा लाटता येतील हा त्यांचा प्रयत्न आहे,” असा हल्लाबोल त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, “या विधेयकामुळे पारदर्शकता येणार होती. त्यामुळे जमिनी लाटणाऱ्यांना याची अडचण होणार होती. वक्फचा कारभार असाच सुरु राहावा जेणेकरून त्यांना जमिनी लाटता येईल, असं विरोधकांना वाटतं. त्यामुळे त्यांनी त्याचा विरोध केला. पण हे विधेयक समितीकडे आहे आणि त्यावर योग्य निर्णय होईल,” असेही ते म्हणाले.