“वैचारिक भिकेचे डोहाळे लागलेल्या उद्धव ठाकरेंना…”; केशव उपाध्येंची टीका

मुंबई : अमित शहा भाजपाचे अध्यक्ष असतानाही अमित शहा भाजपाचे अध्यक्ष असतानाही चर्चेसाठी मातोश्रीवर आले होते. पण वैचारिक भिकेचे डोहाळे लागलेल्या उद्धव ठाकरेंना ते पटले नाही, असा घणाघात भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंनी केला आहे. उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर त्यांनी टीका केली आहे.

केशव उपाध्ये म्हणाले की, “स्वाभिमान गमावणे याचा सोपा अर्थ बघायचा असेल, तर लोकांनी आजच्या उद्धव ठाकरे आणि उबाठाकडे बघावं. २५ वर्ष भारतीय जनता पक्षासोबत वैचारिक तत्वांवर आधारलेली युती ही प्रत्यक्ष बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांसारख्या महाराष्ट्राच्या धुरिणांनी काँग्रेसला सत्तेबाहेर करण्यासाठी अस्तित्वात आणली होती. भाजपसोबत लढताना १२५ पेक्षा जास्त जागांवर लढणारी शिवसेना, म्हणजे आताची उबाठा कशाबशा १०० जागा मिळवण्यासाठी कुटुंबासह दिल्लीचे उंबरे झिजवत आहे.”

 

“दिल्लीपुढे आम्ही झुकत नाही, आमचा स्वाभिमान झुलवत नाही, आम्ही कोणाला विचारायला जात नाही, असे म्हणून डरकाळ्या फोडणारे ठाकरे आज दिल्लीत जाऊन दोन चार जागांसाठी काँग्रेस नेत्यांच्या घराचे हेलपाटे घालत आहेत. ज्या अमित शहांची तुलना उद्धव ठाकरेंनी अब्दालीशी केली, तेच अमित शहा भाजपाचे अध्यक्ष असतानाही मातोश्रीवर चर्चेसाठी आले आणि योग्य तो सन्मान दिला. पण वैचारिक भिकेचे डोहाळे लागलेल्या उद्धव ठाकरेंना ते पटले नाही,” असा घणाघात त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, ” ज्या राजकीय महत्वाकांक्षेपोटी आणि सत्तेच्या हव्यासापोटी भाजपसोबतची युती तोडली, ती सत्ता तर गेलीच, पक्षही गेला. चुकून आणि दुर्दैवाने मिळालेलं मुख्यमंत्रीपदही गेलं आणि आता ज्यांच्या आग्रहाखातर मुख्यमंत्रीपद स्विकारले असं उध्दव ठाकरे सांगत होते, ती काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट म्हणजेच महविकास आघाडी आज तुमचे नावही मुख्यमंत्रिपदासाठी घेत नाही. एकेकाळी ज्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या निवडणुका लढवल्या जायच्या, जे जागा वाटप करण्याचे सूत्र ठरवायचे, तेच आज जागांचा जोगवा मागत फिरत आहेत,” अशी टीकाही केशव उपाध्येंनी केली आहे.