शिमल्यात मशिदीवरुन मोठा वाद, मशिदीच्या दिशेने निघालेल्या आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज

हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे संजौली मशिदीवरुन निर्माण झालेला वाद थांबण्याच नाव घेत नाहीय. या दरम्यान हिंदू संघटनांनी आज विरोध प्रदर्शन आयोजित केलं. आंदोलक इतक्या संख्येने आले की, त्यांनी बॅरिकेडींग तोडलं. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची चांगलीच दमछाक झाली. अखेर आंदोलकांनी बॅरिकेडींग तोडलं. आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. वॉटर कॅननचा वापर करण्यात आला. आंदोलक मशिदीच्या दिशेने जात होते. त्यावेळी त्यांना काही प्रमाणात नियंत्रित करण्यात पोलिसांना यश आलं. पोलिसांनी आंदोलकांना पळवून लावलं. पण काही अंतरावर त्यांचं विरोध प्रदर्शन सुरु आहे.

संजौली येथील बोगदा पूर्ण बंद करण्यात आला होता. टनलच्या जवळ पेट्रोल पंप आहे. आंदोलक तिथे रस्त्यावर बसले व त्यांनी हनुमान चालीसा पठन केलं. संजौलीमध्ये शांती व्यवस्थेसाठी संपूर्ण भागात बुधवारी सकाळी ७ वाजल्यापासून कलम १६३ लागू करण्यात आलं होतं. पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांच्या एकत्र जमण्यावर बंदी घालण्यात आली होती.

‘ही मशिद बेकायदेशीर असेल, तर…’
संजौली भागात मशिदीच कथित बेकायदेशीर निर्माण करण्यात आल्याचा दावा करण्यात येतोय. त्या विरोधात हे प्रदर्शन होतं. यावर हिमाचल प्रदेशचे मंत्री विक्रमादित्य सिंह म्हणाले की, “सर्वांना शांततामय मार्गाने विरोध करण्याचा अधिकार आहे. सरकारने सुद्धा हेच म्हटलय” “शांतता भंग होईल, अशी स्थिती निर्माण होऊ नये. म्हणून खबरदारीच्या हेतूने पोलिसांनी पावलं उचलली आहेत. कलम १६३ लागू करण्यात आलय” असं विक्रमादित्य सिंह म्हणाले. “हे प्रकरण न्यायालयात विचाराधीन आहे. सुनावणीनंतर सरकार निर्णय घेईल. ही मशिद बेकायद असेल, तर निश्चित कारवाई केली जाईल. नगर आयुक्तांच्या आदेशानंतर हे पाऊल उचलण्यात येईल. त्याआधी कारवाई करणं योग्य नाही” असं विक्रमादित्य सिंह म्हणाले.