शेतकऱ्यांनो काळजी घ्या! आजपासून पुढचे चार दिवस जळगावला अलर्ट जारी

जळगाव । एकीकडे राज्यात उन्हाचा तडाखा वाढलेला असतानाच दुसरीकडे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आजपासून पुढचे चार दिवस जळगाव जिल्ह्याला देखील येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढणार आहे.

या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हवामान खात्याने (IMD) महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे.त्यानुसार  जळगाव जिल्ह्याला आजपासून पुढचे चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. यादरम्यान, विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि 30-40 किमी ता. सोसाट्याचा वारावाहण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने वर्तविला आहे.

एकीकडे उन्हाचा पारा वाढल्याने नागरिक घामाघूम झाले होते. दोन दिवसापूर्वी राज्यातील सार्वधिक तापमानाची नोंद जळगावात झाली आहे. त्यातच आता अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला असल्याने मागील दोन तीन दिवसापासून अधून मधून ढगाळ वातावरण होत आहे. दुपारून ऊन सावलीचा खेळ सुरु आहे. अवकाळीचा पावसाने जिल्ह्यातील तापमानाचा पारा 40शी खाली येऊ शकतो.