सरकार ४४ लाख शेतकर्‍यांचे वीज देयक भरणार , ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज’ योजनेची घोषणा

मुंबई :  महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना-२०२४’ ची घोषणा केली आहे. या योजनेद्वारे ७.५ अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपाना पूर्णत: विनामूल्य वीज पुरवली जाणार आहे. राज्यातील ४४ लाख ३ हजार शेतकर्‍यांना याचा लाभ होणार आहे. एप्रिल २०२४ पासून या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

शेतकर्‍यांना साहाय्य करण्यासाठी आणि त्यांची थकबाकी वाढू न देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना’ चालू केली आहे. वर्ष २०२४ ते २०२९ या ५ वर्षांसाठी ही योजना राबवली जाणार आहे. ७.५ अश्वशक्तीपर्यंत शेतीपंप असलेल्या शेतकर्‍यांना याचा लाभ घेता येणार आहे. सद्यस्थितीत शासन वीजदेयकाच्या सवलतीपोटी महावितरणाला १४ हजार ७६० कोटी रुपये देत आहे.

शेतीसाठी ३० टक्के वीजेचा उपयोग
राज्यात एकूण ४७ लाख ४१ हजार कृषीपंप ग्राहक आहेत. या सर्वांना महावितरणकडून वीजपुरवठा केला जातो. राज्यातील एकूण वीजग्राहकांपैकी १६ टक्के कृषीपंप ग्राहक आहेत. राज्यातील एकूण ऊर्जेच्या वापरापैकी ३० टक्के वीज शेतीसाठी वापरली जाते. शेतीसाठी वर्षाला एकूण ३९ हजार २४६ दक्षलक्ष युनिट विजेचा उपयोग होतो.