सांगली : उद्धव ठाकरेंनी केली उमेदवाराची घोषणा, नाना पटोले यांनी व्यक्त केली नाराजी, मविआत पुन्हा तणाव!

सांगली : सांगलीच्या लोकसभा उमेदवारावरून महाविकास आघाडीमध्ये काही दिवसांपासून वाद चालू होता. लोकसभा निवडणुकीसाठी उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 21 मार्च रोजी सांगलीचा उमेदवार जाहीर केला. मात्र उद्धव ठाकरेंच्या याच घोषणेनंतर महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला आहे.ठाकरेंनी सांगलीचा उमेदवार जाहीर केल्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर नाराजी व्यक्त केलीय.

काय म्हणले नाना पटोले ?
नाना पटोले यांनी आज माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीवर स्पष्ट नाराजी व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांनी सांगलीमध्ये एकतर्फी उमेदवारी जाहीर करणे हे अडचणीचे झाले आहे. महाविकास आघाडीमध्ये हे व्हायला नकोय. एकीकडे चर्चा चालू असताना दुसरीकडे त्या जागेवर नाव जाहीर करायला नको होते. उद्धव ठाकरे यांनी अशा पद्धतीने नाव जाहीर करणे योग्य झालेलं नाही, अशा शब्दांत पटोले यांनी नाराजी व्यक्त केली.