धरणगाव शहरातील वादग्रस्त अतिक्रमण अखेर हटविले

जळगाव : धरणगाव शहरालगत असलेल्या गट नं. 1248/2 मधील वादग्रस्त अतिक्रमण बुधवारी मोठ्या बंदोबस्तात शांततेत काढण्यात आले. दरम्यान, आज रात्री आठ वाजेपासून तर शुक्रवार सकाळी 8 वाजेपर्यंत कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. याबाबतचे आदेश प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी काढले आहेत. गायरान जागेवरील हे अतिक्रमण काढण्यात यावे यासाठी याआधी अनेक वेळा आंदोलनेही झाली असून, मोर्चादेखील काढण्यात आला होता.

गायरान बचाव मंचने धरणगाव शहरातील गट क्र. 1248 व गट नं 1248/9 या गायरानसाठी आरक्षित शासकीय जागेवर मानवसेवा संकल्प प्रतिष्ठान, मुंबई यांनी केलेले अतिक्रमण काढण्यात यावेत, अशी तक्रार केली होती. त्यावर जिल्हाधिकार्‍यांनी तत्काळ अतिक्रमण काढण्याबाबतचे आदेश काढले होते. त्यानंतर हेच आदेश नाशिक आयुक्तांनी कायम ठेवले होते. त्यामुळे बुधवारी सकाळी धरणगाव पोलिसांनी शांतता कमेटीची बैठक बोलविली होती. या बैठकीत शहरातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते. यावेळी पोलीस अधिकारी तथा महसूलच्या अधिकार्‍यांनी गावात सामाजिक एकोपा जपण्याचे आवाहन केले. तसेच वादग्रस्त परिसरात कलम 144 लागू केले असल्याचे जाहीर केले. तसेच संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया समजावून सांगितली. धरणगावकरांनी सामंजस्याची भूमिका घेतल्यामुळे त्याच ठिकाणी वातावरण निवळले होते. परंतु खबरदारी म्हणून सायंकाळी संपूर्ण शहरात दोन दिवसासाठी कर्फ्यू अर्थात संचारबंदी लावण्यात आली. याबाबतचे आदेश प्रांतधिकारी विनय गोसावी यांनी काढले आहेत.

संवेदनशील विषयाची धरणगाव पोलिसांकडून उत्कृष्ट हाताळणी

अतिक्रमण हटविण्याबाबत गावात काही दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. जिल्हाधिकारी अमन मित्तल, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी धरणगावला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला होता. प्रांताधिकारी गोसावी, चाळीसगाव विभागाचे अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश रावले, पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी संवेदनशील विषयाची उत्कृष्ट हाताळणी केल्यामुळे गावात शांतता आहे.

मुख्य भागात कडक बंदोबस्त

धरणगाव शहरातील मुख्य भागात पोलिसांनी कडक बंदोबस्त लावला होता. त्यात 100 पोलीस कर्मचारी, 20 महिला कर्मचारी, 4 आरसीपी प्लाटून, 10 पोलीस अधिकारी आणि 2 डीवायएसपी दर्जाचे अधिकारी यांचा समावेश होता. दरम्यान, अतिक्रमण काढण्याच्या कारवाईचा गावात कुठेही तणाव जाणवला नाही. सर्वत्र पोलिसांचा कडक बंदोबस्त होता.

नेमकं काय म्हटलंय आदेशात

उपविभागीय दंडाधिकारी विनय गोसावी यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, संपूर्ण धरणगाव शहरात दि. 2 नोव्हेंबरचे रात्री 8 वाजेपासून 4 नोव्हेंबरच्या सकाळी 8 वाजेपावेतो संचारबंदी लागू करण्याचा आदेश पारित केला आहे. या बाबीचे गांभीर्य लक्षात घेता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याचे गांभीर्य लक्षात घेता वेळेअभावी हा आदेश एकतर्फी लागू करण्यात येत आहे. हा आदेश अत्यावश्यक सेवा जसे रूग्णसेवा, पाणीपुरवठा, आरोग्य, सार्वजनिक वितरण व्यवस्था, अंत्यविधी तसेच शासकीय कर्तव्यावर हजर शासकीय अधिकारी/कर्मचारी, धरणगाव शहरातून जाणारे मुख्य रस्त्यावरुन वाहतूक तसेच पोलीस अधिकारी व बंदोबस्तातील कर्मचारी यांना लागू राहणार नाही.

सोशल मीडियातही आवाहन

प्रशासनाने संचारबंदी लागू केल्यानंतर सोशल मीडियात आदेशाची प्रत व्हायरल करण्यात आली आहे. तसेच एक ऑडिओ क्लिपही टाकण्यात आली आहे. दरम्यान, अफवा पसरविणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारादेखील पोलिसांकडून देण्यात आला आहे. दरम्यान, गावात संचारबंदी बाबत दवंडीही देण्यात आली आहे.